नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत निवडणूक आयोगाने देशभरात टाकलेल्या धाडीतून तीन हजार कोटी जप्त केल्याची धक्कादायक माहिती आहे. आतापर्यंत निवडणुकीचे चार टप्पे पार पडलेत. आणखी तीन टप्पे व्हायचे आहेत. तोपर्यंत दहा हजार कोटीं जप्त होतील असा अंदाज आहे.
पहिल्या निवडणुकीपासूनच मतांसाठी मागच्या दाराने पैशांचे वाटप केले जाते असे बोलले जाते. यामुळेच या अवैध पैसे वाटपावर निवडणूक आयोगाची करडी नजर असते. या वर्षी हे प्रकार कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली होती, पण त्याचा काहीच परिणाम झालेला नाही असे दिसत आहे.
देशभर सर्वत्रच काळ्या पैशाचा सुळसुळाट आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक्षणानुसार एकूण काळया पैशाचा आकडा मोठा टप्पा पार करेल. हा अंदाज खरा ठरल्यास 2019ची लोकसभा निवडणूक सर्वात महागडी निवडणूक ठरेल.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तपास यंत्रणा आणि निवडणूक आयोगामध्ये खटकेही उडत आहेत. तपास यंत्रणांनी निष्पक्ष कारवाई करावी असा सल्लाच निवडणूक आयोगाने तपास यंत्रणांना दिला आहे. आतापर्यंत तपास यंत्रणांनी मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या नेत्यांच्या घरांवर तर तमिळनाडूत डीएमके नेत्यांच्या घरांवर छापे मारले आहेत. मतदारांना भुलवण्यासाठी काळा पैसा वापरणाऱ्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांवर कठोर कारवाई करा, असे निवडणूक आयोगाने बजावले आहे.