नवी दिल्ली : देशातच नव्हे तर जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारो रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. यावर मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे हा नामी उपाय असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती करण्याची गरज असल्याचं म्हटलं जातंय. मात्र, याच लस निर्मितीवरुन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील मोठ्या उद्योजकांपैकी एक असणारे बिल गेट्स यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतासहीत अनेक विकसनशील देशांना लसनिर्मितीचा फॉर्म्यूला देऊ नये असे म्हटले आहे.
बिल गेट्स नेमकं काय म्हणाले ?
बिल गेट्स यांनी स्काय न्यूज या विदेशी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. यावेळी सध्याच्या वैश्विक कोरोनास्थितीवर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये बैद्धिक संपदा हक्का हा कायदा बाजूला केल्यामुळे जगातील सर्व देशांना कोरोना लस मिळण्यासाठी मदत होईल का ?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी लसीचा फॉर्म्यूला इतर देशांना देण्यात येऊ नये असे स्पष्टपणे सांगितले. जगात अनेक औषधनिर्माण करणाऱ्या कंपन्या कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्मिती करत आहेत. सध्या जगातील लोक लसीच्या सुरक्षेबाबत अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे जगात सर्वांसोबत लसनिर्मितीचा फॉर्म्यूला शेअर केला जाऊ नये. लसनिर्मिती करणारी अमेरिकेची जॉन्सन अँड जॉन्सन आणि भारतात लस निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये मोठा फकर आहे,” असे वक्तव्य बिल गेट्स यांनी आपल्या मुलाखतीदरम्यान केलं.
लसीच्या सुरक्षेचा हवाला
यावेळी बिल गेट्स यांनी विकसनशील देशांना लस निर्मितीचा फॉर्म्यूला दिला जाऊ नये या मताचं समर्थन केलं. त्यासाठी त्यांनी लसीच्या सुरक्षेचा हवाला दिला. “लस निर्मितीचा फॉर्म्यूला हा एखाद्या पाककलेसारखा नाही, जो कोणालाही देता येईल. इथे बौद्धिक संपदेच्या हक्काची गोष्ट नाहीये. तर येथे सुरक्षेचा मुद्दा आहे. लस तयार करताना काळजी घ्यावी लागते. टेस्टिंग तसेच ट्रायल करावे लागतात. तसेच लस तयार करताना खूप खबरदारी घ्यावी लागते,” असे बिल गेट्स यांनी म्हटलं.
बिल गेट्स यांच्यावर सर्व स्तरातून टीका
बिल गेट्स यांनी केलेल्या वरील वक्तव्यानंतर जागितक पातळीवर त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जातोय. ब्रिटन येथील युनिव्हर्सिटी ऑफ अॅक्सेस येथे कायद्याच्या प्राध्यापिका तारा वान यांनी “भारतातील लोकांच्या मृत्यूला रोखले जाऊ शकत नसल्याचे बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. पश्चिमी देश भारताला मदत कधी करणार आहेत. मुळात अमेरिका आणि ब्रिटनने बौद्धिक संपदा हक्काच्या अधिकाराखाली इतर विकसनशील देशांना ओलीस ठेवले आहे. हे अतिशय घृणास्पद आहे,” अशा शब्दांत बिल गेट्स यांच्यावर टीका केली.
पत्रकार स्टीफन बर्नी यांनी ट्विटद्वारे गेट्स यांना धारेवर धरलंय. “गेट्स एक आशावादी व्यक्ती आहेत. मात्र, वास्तवात जागाबद्दल त्यांचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. आपण जास्त लसनिर्मिती करु शकत नाही. तसेच आपण नफ्याशी तडजोडसुद्धा करु शकत नाहीयेत. तसेच आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत विकसीनशील देशांवर विश्वास ठेवू शकत नाही. आपण खाऊन झाल्यावर त्या देशांना आपलं उष्ठं मिळेल. हे अतिशय चुकीचं आहे,” अस पत्रकार बर्नी यांनी म्हटंलय.