Septic Tank Cleaning Accident : बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सेफ्टिक टँक साफ करताना एकाच कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला, तर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना सराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्वरपूर गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शिवजी साह यांच्या घरी सुमारे दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या १५ फूट खोल सेफ्टिक टँकची साफसफाई सुरू होती. सर्वप्रथम त्यांचा १८ वर्षीय नातू प्रियांशू टाकीत उतरला. सुरुवातीला काही वेळ त्याचा आवाज येत होता. मात्र १५ मिनिटांनंतर प्रतिसाद बंद झाला. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. प्रियांशूला बाहेर काढण्यासाठी त्याचे वडील आनंद कुमार (४६) टाकीत उतरले. त्यांचाही संपर्क तुटल्यानंतर आनंद यांचे भाऊ राहुल कुमार (२४) आणि पंकज कुमार मदतीसाठी खाली उतरले. मात्र टाकीत साचलेल्या विषारी वायूमुळे एकामागून एक सातही जण बेशुद्ध पडले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला कळवले. पथकाने दोरीच्या सहाय्याने सर्वांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्रियांशू, आनंद, राहुल आणि पंकज यांना मृत घोषित केले. उर्वरित तिघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मृतांपैकी राहुल यांचा विवाह अवघ्या पाच दिवसांपूर्वी झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून साह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक तपासात सेफ्टिक टँकमधील विषारी वायू हेच मृत्यूचे कारण असल्याचे स्पष्ट झाले असून पुढील तपास सुरू आहे.