पाटणा – बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांची गुरूवारी हिंदुस्थानी अवाम मोर्चाच्या (हम) विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. हम बिहारच्या सत्तेत सहभागी होणार असला तरी मंत्रिपद न स्वीकारण्याचा निर्णय मांझी यांनी घेतला आहे. याआधी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली असल्याने मंत्री बनण्यास उत्सुक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बिहारच्या मावळत्या विधानसभेत मांझी यांच्या रूपाने हमचा केवळ एक आमदार होता. मात्र, यावेळी मांझी यांच्यासह हमचे चार आमदार विधानसभेत दिसतील. तो पक्ष बिहारची सत्ता राखणाऱ्या एनडीएचा घटक आहे. एनडीएकडे काठावरचे बहुमत असल्याने हमच्या वाट्याला एक किंवा दोन मंत्रिपदे येण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, मांझी यांनी बिहारमधील कॉंग्रेस आमदारांना एनडीएत सहभागी होण्याचे निमंत्रण देऊन विरोधकांच्या महाआघाडीत अस्वस्थता पसरवली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विकासाच्या योजना कॉंग्रेसपेक्षा वेगळ्या नाहीत.
त्याशिवाय, बिहारच्या हिताच्या नसणाऱ्या अनेक मुद्द्यांपासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवले आहे. त्यामुळे कॉंग्रेस आमदार आमच्याबरोबर एनडीएमध्ये येऊ शकतात आणि बिहारच्या विकासात योगदान देऊ शकतात, असे त्यांनी म्हटले.
अयोध्येतील राम मंदिर आणि तिहेरी तलाक यांसारख्या मुद्द्यांपासून लांब राहणेच नितीश यांनी पसंत केले. मांझी यांनी तो संदर्भ दिल्याचे मानले जात आहे.