पाटणा – आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. बिहारमध्ये 12 जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने देशातील सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. नितीश यांच्या हालचालींमुळे ते आता भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. विस्मरण झालेले मुख्यमंत्री आता स्वप्नात स्वत:ला देशाचे पंतप्रधान झालेले पाहत आहेत अशा शब्दांत भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी नितीश यांच्यावर टीका केली आहे.
तर भाजपच्या याच कार्यक्रमात पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनीही 2025 मधील बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा विजय होईल आणि आम्हीच दिवाळी साजरी करू असा विश्वास व्यक्त केला.
बिहारमध्ये जेंव्हा आमचे सरकार स्थापन होईल तेंव्हा ते योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमधील सरकारसारखे असेल आणि प्रत्येक गुंडावर गोळी झाडली जाईल असेही जयस्वाल यांनी नमूद केले.
जयप्रकाश नारायण यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या विरोधातील जन आंदोलनाची सुरूवात बिहारमधून केली होती. तोच संदर्भ घेत आता नरेंद्र मोदी सरकारच्या आंदोलनाची सुरूवात बिहारमधून केली जाते आहे. विरोधी पक्ष एकवटणार असल्यामुळे बिहारचा पारा वाढताना दिसतो आहे.
प्रदेश भाजपचे नेते त्यामुळेच आक्रमक झाले आहेत तर विरोधी पक्षांचे नेतेही मोदी सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. 12 जूनपर्यत या राज्यात बऱ्याच घडामोडी घडणार आहेत आणि त्यानंतर खरेच विरोधी पक्षांची एकजिनसी आघाडी स्थापन होते का याचे चित्र स्पष्ट होणार आहे.