नवी दिल्ली : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसेचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी छपरा येथील प्रचार रॅलीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये डबल इंजीनचे सरकार नाही, तर धोकेबाज आणि घोटाळेबाज सरकार आहे, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
मा. मोदी जी,
2015 चुनाव में नीतीश कुमार जी को “18वीं सदी की मानसिकता वाला” बता गए थे।
आज उन्हें छपरा में “डबल इंजन” बता रहे।
सच ये है कि ये “डबल धोखे” की सरकार है।
एक “जुमलेबाज” और एक “धोखेबाज”,
बिहार की जनता करेंगे दोनों का इलाज!#बोले_बिहार_बदलें_सरकार— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) November 1, 2020
याचबरोबर सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींना पाच वर्षांपूर्वी नितीश कुमार यांना ओल्ड मॉडल म्हटल्या गेल्याची देखील आठवण करून दिली. सुरजेवाला यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ”मोदीजी, २०१५ मधील निवडणुकीत नितीश कुमार यांना १८ व्या शतकातील मानसिकतेचे म्हणाले होते. आज त्यांना छपरा येथे डबल इंजीन म्हणत आहेत. मात्र सत्य हे आहे की, हे डबल धोक्याचे सरकार आहे. एक घोटाळेबाज आणि एक धोकेबाज, बिहारची जनता करणार दोघांचा उपचार! बोले बिहार बदलें सरकार”
पंतप्रधान मोदी यांनी आज छपरा येथील सभेत लालू-राबडी शासनकाळातील आठवण करून देत लोकांना म्हटले की, ”तेव्हा बिहारमध्ये विकास होत नव्हता. कंत्राट निघाले तरी देखील अभियंता आणि ठेकेदार कामं करत नव्हते. कारण, त्यांच्याकडून अगोदर खंडणी मागितली जात होती. यामुळे कुणीच काम करत नव्हतं.” तसेच, आता राज्यात डबल इंजीनचे सरकार आहे व राज्यात विकासाची चाकं धावत असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.
तेजस्वी यादव व राहुल गांधी या जोडीवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, ”बिहारमध्ये एकीकडे डबल इंजीनचे सरकार आहे, तर दुसरीकडे डबल युवराज आहेत. त्यातील एक जंगलराजचे युवराज आहे. उत्तर प्रदेशमध्ये हरणाऱ्या युवराजने आता जंगलराजमधील युवराजाशी हात मिळवला आहे. त्यांना केवळ कुटुंबाची चिंता आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झालं आहे.” तसेच, यावेळी ”पंतप्रधान मोदी म्हणाले की, डबल इंजीनचे एनडीए सरकार बिहाराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. तर, हे डबल-डबल युवराज आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी भांडत आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी देखील उत्तर प्रदेशमधील निवडणुकीतही डबल-डबल युवराज बसवर चढून लोकांसमोर हात हालवत होते. उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना घरी पाठवले. तेथील युवराज आता जंगलराजमधील युवराजाला भेटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये जे डबल-डबल युवराजचे झाले. तेच बिहारमध्ये होणार आहे.”