पाटणा – बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडीचे सरकार स्थापन होऊन आठवडाही झाला नाही तोच एकापाठोपाठ एक बंडाचे आवाज उठू लागले आहेत. ताज्या वादात मंत्री लेसी सिंह यांच्यावर आरोप करणाऱ्या आमदार विमा भारती यांच्यावर सीएम नितीश कुमार भडकले. नितीश कुमार म्हणाले, प्रत्येकाला मंत्री बनवता येत नाही, ज्याला जिकडे जायचे असेल तिकडे जा. लेसी सिंह आणि विमा भारती या दोघीही जेडीयूच्या आमदार आहेत आणि दोन्ही महिला नेत्या यापूर्वी मंत्री झालेल्या आहेत. यावेळी लेसी सिंह यांना मंत्री करण्यात आले, मात्र विमा भारती यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. त्यानंतर विमा भारती यांनी लेसी सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
विमा भारती यांनी आरोप केला की, लेसी सिंह ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आहेत आणि त्या त्यांच्या परिसरात खंडणी उकळण्याचे काम करतात. धमकावणे,खंडणी उकळणे आणि त्यांच्या विरोधात बोलणाऱ्याला ठार मारणे, हे लेसी सिंह यांचे काम आहे, असे विमा भारती यांनी म्हंटले आहे. चुकीच्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. खुनाच्या आरोपीला सरकारमध्ये मंत्री करण्यात आले.हायकमांडकडेही अनेकवेळा तक्रारी केल्या, मात्र त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अन्यथा आम्ही राजीनामा देऊ, असेही भारती यांनी म्हंटले. दरम्यान, यावर तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अशी वक्तव्ये करू नयेत, असे विमा भारती यांना सुनावले आहे.
या प्रकरणी मीडियाने सीएम नितीश कुमार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही विमा भारती यांच्याशी चर्चा करू आणि त्यांना पक्षाबाबत अशी विधाने करू नयेत, असे समजावू. जर त्यांना समजत नसेल आणि त्यांना दुसरीकडे जायचे असेल तर त्या तसे करू शकतात.