पाटणा – बिहार मध्ये भारतीय जनतापक्षाची संगत सोडून राजदशी नितीशकुमारांनी नवा घरोबा करीत आज सरकार स्थापन केले असून आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. राजद आणि जेडीयु यांनी सरकार स्थापनेपुर्वीच सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चीत केल्याचे सांगितले जात आहे. या महागठबंधन मध्ये 79 आमदार असलेल्या राजदला सर्वाधिक मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. जेडीयुचे येथे 45 आमदार असून कॉंग्रेसचे 19 आणि डाव्या पक्षांचे एकूण 16 आमदार आहेत.
येथे मिळालेल्या माहितीनुसार बिहारच्या मंत्रिमंडळात जेडीयु पक्षाला 13 आणि राजदला 16 मंत्रिपदे मिळतील असे समजते. कॉंग्रेसला चार, आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाला 1 मंत्रीपद दिले जाणार आहे. जेडीयुकडे सध्या असलेलीच खाती कायम ठेवली जातील आणि भाजपकडे असलेली खाती राजदला मिळतील असे सांगण्यात येत आहे. बिहारचे गृहमंत्रीपद मात्र नितीशकुमार हे स्वताकडेच ठेवण्याची शक्यता आहे. तेजस्वी यादव यांना कोणते खाते मिळणार हे मात्र अजून निश्चीत झालेले नाही.
राजदने आपल्या मंत्र्यांची नावे निश्चीत केली असून त्यांनी ती यादी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याकडे संमती साठी पाठवली होती, त्याला संमती मिळाली आहे. कॉंग्रेसची मंत्रिपदाची यादी अजून पुढे आलेली नाही. पक्ष श्रेष्ठींकडून ही नावे निश्चीत केली जाणार आहेत. जेडीयुची यादी तयार आहे.