विराट कोहली गेल्या एक दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटचा पोस्टर बॉय आहे. भारतीय कर्णधाराने आधुनिक युगातील महान फलंदाज म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23558 धावा केल्या आहेत आणि 70 शतकेही झळकावली आहेत. त्याच्या फलंदाजीच्या पराक्रमाव्यतिरिक्त, कोहलीने मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्याच्या वर्तनासाठी प्रसिद्धी मिळवली आहे.
सध्या केपटाऊन येथे सुरु असलेल्या भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील निर्णायक तिसर्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी तिसर्या पंचांनी आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गरला नाबाद ठरवल्याने विराटने स्टम्प माईक जवळ जाऊन शेरेबाजी केली. विराटच्या या वर्तणुकीमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
या पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झालेल्या 3 मोठ्या वादांवर प्रकाश टाकणार आहोत.
1) अनिल कुंबळे यांच्याशी मतभेद : जून 2016 मध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने अनिल कुंबळे यांची भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती.
दिग्गज लेग-स्पिनरने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका विजयाने आपल्या प्रशिक्षण कारकिर्दीची सुरुवात केली. तथापि, मार्च 2017 मध्ये चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या निवडीवरून कोहली आणि कुंबळे यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या.
मे 2017 मध्ये, जेव्हा कुंबळे पुन्हा एकदा प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणार होते, तेव्हा कुंबळे आणि कोहली यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या. कर्णधार आणि संघातील काही सदस्यांनी कुंबळे यांच्या विरोधात बीसीसीआयला तक्रार केल्याने कुंबळे यांनी स्वताच प्रशिक्षक पदासाठी पुन्हा अर्ज न करण्याचा निर्णय घेतला.
कर्णधाराला माझ्या ’शैली’बद्दल आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून माझ्या कायम राहण्याबद्दल आक्षेप होता. त्यामुळे मी त्या पदावर राहणे भारतीय संघासाठी हितकारक नाही, असे वक्तव्य त्यावेळी कुंबळे यांनी त्यावेळी करत आपल्या प्रशिक्षण कारकिर्दीला स्वल्पविराम दिला होता.
2) कोहली-गंभीर आमने सामने : विराट कोहलीचा माजी सलामीवीर आणि कोलकाता नाईट रायडर्सचा तत्कालीन कर्णधार गौतम गंभीरसोबत मैदानावर जोरदार वाद झाला होता. ही घटना इंडियन प्रीमियर लीगच्या 2013 च्या मोसमातील कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामन्यात घडली होती. कोहली बंगळुरू संघाचा कर्णधार होता, तर गंभीर कोलकाता संघाचा कर्णधार होता.
बंगळुरूच्या डावाच्या 10व्या षटकात ही घटना घडली. लक्ष्मीपती बालाजीने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू कोहलीने थेट इऑन मॉर्गनवर हातात मारला, आणि 35 धावांवर बाद झाला. त्यावेळी गंभीर कोहलीला काहीतरी बोलल्यामुळे कोहलीला त्याचा राग आला. त्यावेळी रागाच्या भरात दोन्ही खेळाडू एकमेकांवर धावून गेले.
परिस्थिती चिघळण्यापूर्वीच पंच आणि खेळाडूंनी दोघांना वेगळे केले. या सामन्यात बंगळुरू संघाने कोलकाता संघाचा 8 गडी राखून पराभव केला.
3) मिचेल जॉन्सनशी बाचाबाची : 2014 मध्ये जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेव्हा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या सर्व आशा विराट कोहलीवर टेकल्या होत्या. कोहलीला सचिन तेंडुलकरचा उत्तराधिकारी म्हणून ओळखले जात होते. वर्षाच्या सुरुवातीलाच कोहलीला इंग्लंमध्ये निराशाजनक कामगिरीला समाोरे जावे लागले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी करत टिकाकारांना सडेतोड उत्तर देण्यासाठी विराट उत्सुक होता.
विराटने सर्वांता अपेक्षा पूर्ण करत मालिकेत 4 शतके झळकावली. पण नंतर, त्याच्या फलंदाजीतील पराक्रमाव्यतिरिक्त, मेलबर्न येथील तिसर्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनसोबत कोहलीच्या वादानेही प्रसिद्धी मिळवली. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने गरज नसताना कोहलीकडे स्वत:च्या गोलंदाजीवर थ्रो मारला जो कोहलीला लागला. त्यावेळी त्या दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
अखेरीस जॉन्सनने कोहलीला 169 धावांवर बाद केले. जॉन्सनसोबतचा हा सामना हा कोहली एक लढवय्या खेळाडू असल्याचा पुरावा होता. जेव्हा कोणी विराटला छेडतो त्याची परतफेड करायला तो विसरत नाही.