तारौबा (त्रिनिदाद) – येथे सुरू असलेल्या १९ वर्षाखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरु आहे. सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविल्या नंतर भारताच्या युवा संघाने आयर्लंडचा १७४ धावांनी दणदणीत पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना हरनूर सिंग आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्या दमदार फलंदाजीने भारताने ५ बाद ३०७ धावांची मजल मारली. त्यानंतर गोलंदाजांनी अचूक कामगिरी करताना आयर्लंजडला ३९ षटकांतच १३३ धावांत गुंडाळले.
आव्हानाचा पाठलाग करताना भारताला आयर्लंडला रोखणे फारसे कठिण गेले नाही. कोविडने ११ खेळाडूही जमवणे आव्हानात्मक राहिलेल्या भारतीय खेळाडूंनी सामन्यात मैदानाबाहेरील संकटाचा कुठलाही परिणाम खेळावर झाला नसल्याचे दाखवून दिले. त्यांचे सलामीचे फलंदाज जबरदस्त खेळी खेळले आणि नंतर गोलंदाजांनी अचूक कामगिरी केली. विशेष म्हणजे भारताच्या आठ खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यातील सहा गोलंदाजांनी विकेट मिळविल्या.
त्यापूर्वी, अंगक्रिश आणि हरनूर यांनी २५ षटकांतच १६४ धावांची सलामी दिली. आक्रमक सुरवात मिळाल्यावर नंतर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने त्यांचा कित्ता गिरवून आयर्लंडची गोलंदाजी चोपून काढली. अंगक्रिश चेंडूंला धाव या गतीने खेळत ७९ धावा काढून बाद झाला. त्याने १० चौकार आणि २ षटकार लगावले.
संक्षिप्त धावफलक –
भारत ५० षटकांत ५ बाद ३०७ (हरनूर सिंग ८८ (१०१), अंगक्रिश रघुवंशी ७९ (७९), मुझामी शेरझाद ३-७९, जेमी फोर्बस १-३८) वि. वि. आयर्लंड ३९ षटकांत सर्वबाद १३३ (स्कॉट मॅकबेथ ३२, जोसहा कॉक्स २८, अनमीश्वर गौतम २-११, कौशल तांबे २-८)