नवी दिल्ली – देशातील सर्वच राष्ट्रीयकृत बॅंकांचे खासगीकरण केले जाणार नाही अशी भूमिका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडली आहे. बॅंक कर्मचारी या खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी ही भूमिका मांडली आहे.
बॅंकांनी लोकांच्या अपेक्षा पुर्ण कराव्यात अशी सरकारची अपेक्षा आहे असेही त्यांनी म्हटले आहे. ज्या बॅंकांचे खासगीकरण केले जाणार आहे त्या बॅंकांमधील कर्मचाऱ्यांच्या हिताची जपणूक केली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या संबंधात सरकारचे धोरण अतिशय स्पष्ट असून आम्ही तेथील कर्मचाऱ्यांच्या हिताची संपुर्ण काळजी घेऊ.
अर्थमंत्र्यांच्या विधानावरून बॅंकांच्या खासगीकरणाची प्रक्रिया आता थांबणार नाही असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विरोध केला तरी खासगीकरणाची प्रक्रिया पुर्ण केलीच जाणार आहे असे संकेतही यातून मिळत आहेत. कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यां शाबुत ठेऊन हे खासगीकरण केले जाईल असे स्पष्ट मत अर्थमंत्र्यांनी मांडले आहे असाही अर्थ त्यांच्या विधानांतून काढला जात आहे.