पणजी – एकीकडे शिवसेना आपला दसरा मेळावा साजरा करत असताना दुसरीकडे गोव्यात सेनेला मोठा धक्का बसला आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशीच गोव्यातील शिवसेनेच्या उपाध्यक्षा राखी नाईक यांनी सेनेला रामराम ठोकला आहे. शिवेसेनेसाठी गोव्याच्या राजकारणात हा मोठा धक्का मानला जात आहे. राखी नाईक यांनी सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.
राखी नाईक म्हणाल्या की, गोव्याच्या प्रश्नात शिवसेनेच्या नेत्यांना रसच नाही. गोव्यातील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात शिवसेना तळमळ दाखवेल, अशी अपेक्षा असल्यामुळेच आपण पक्षात प्रवेश केला होता. मात्र प्रत्यक्षात स्थिती तशी दिसली नाही, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.
गोव्यात पक्षाची वाढ व्हायची असेल, तर गोवेकरांच्या स्थानिक प्रश्नांत लक्ष घालणं गरजेचं आहे. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेना नेते नुसते गोव्यात येतात, मात्र प्रत्यक्षात जनतेच्या प्रश्नावर काहीच हालचाली होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गोव्यातील जनतेप्रति आपली जबाबदारी असून पक्षापेक्षा जनता अधिक महत्त्वाची असल्याचे नाईक म्हणाल्या आहेत.
कुठल्या पक्षात प्रवेश घेण्याबाबत सकारात्मक किंवा नकारात्मक असा कुठलाही विचार सध्या नसून जनतेची कामं करण्यावर आपला भर असेल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.