माजी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाकडे जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या फळीपैकी एक आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकात टीम इंडियाविरुद्ध सामन्यात आज रविवारी पाकिस्तानच्या गोलंदाजांना आश्चर्यकारक कामगिरी करावी लागेल, अन्यथा भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. यासाठी पाकला माेठी मेहनत घ्यावी लागणार आहे, असे भाकित पाकचे माजी कर्णधार जावेद मियादाद यांनी केले.
आज भारत-पाक यांच्यात सामना रंगणार आहे. भारत-पाक लढतीत खेळाडूंवर खूप दबाव असतो. जो दबाव झेलू शकेल, तोच सामन्यात विजय होईल,असे ते म्हणाले.
पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. ते सलग सामने जिंकत आहेत. मात्र, पाकिस्तानला हरवणे भारतासाठी सोपे नसेल. भारताकडे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी गोलंदाजांना भारतीय फलंदाजांना लवकर बाद करावे लागेल, अन्यथा टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारेल. पाकला भीती व दबावाशिवाय खेळावे लागेल.
टी-२० मध्ये लोकांना असे वाटते की, एक किंवा दोन खेळाडू सामने जिंकू शकतात, परंतु माझ्या मते प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे. केवळ २० धावांची छोटी खेळी किंवा महत्त्वाचा झेल, धावचीत व चांगले षटक सामन्याचे चित्र बदलू शकते. मी संघ निवडीवर समाधानी आहे. संघाला चांगली कामगिरी करत आत्मविश्वास वाढवावा लागेल. गोलंदाज व फलंदाज दोघांना उत्कृष्ट खेळावे लागेल. खेळाडूंना ‘इंशाअल्लाह व माशाअल्लाह’ तून बाहेर पडावे लागेल. प्रार्थनेसह चांगल्या कामगिरीने यश मिळेल.
भारतीय संघ फाॅर्मात आहे. कोहली भारताचा उत्कृष्ट खेळाडू आहे, तो सर्व प्रकारांत चांगली कामगिरी करताे. त्याचा एक वेगळा क्लास आहे, ज्यासाठी खेळाडू संघर्ष करतात. कोणत्या गोलंदाजाला कसे खेळवायचे आणि कमी वेळेत धावा कशा करायच्या हे कोहलीला माहीत आहे. कोहली भारताच्या यशाची किल्ली असेल.