20,000-tonne LPG – पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. तब्बल २० हजार टन लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस घेऊन येणारे सिमी हे मालवाहू जहाज गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील कांडला (दीनदयाल) बंदरात रविवारी सुरक्षितपणे दाखल झाले आहे. स्ट्रॅटेजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक मानल्या जाणाऱ्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून मार्ग काढत या जहाजाने भारताचा किनारा गाठला आहे. मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेल्या या सिमी जहाजावर एकूण २१ क्रू मेंबर्स (चालक दल) आहेत, ज्यामध्ये ८ युक्रेनी आणि १३ फिलिपिनो नागरिकांचा समावेश आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे हा सागरी मार्ग सध्या प्रचंड असुरक्षित बनला आहे. मात्र, भारताच्या जहाजबांधणी मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या चोख नियोजनामुळे हे जहाज सुखरूप भारतात पोहोचले. भारतीय नौदलानेही या मार्गावर जहाजांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. भारताचा एकूण कच्च्या तेलाचा साठा सुमारे १५ टक्क्यांनी घसरून १०७ दशलक्ष बॅरलवरून ९१ दशलक्ष बॅरलवर आला आहे. अशा स्थितीत गॅसची ही मोठी खेप येणे अत्यंत गरजेचे होते. दुसरे जहाजही मार्गावर : भारताच्या दिशेने एकूण ६६,३९२ मेट्रिक टन एलपीजी घेऊन दोन जहाजे निघाली होती. त्यापैकी सिमी जहाज कांडला येथे पोहोचले आहे, तर व्हिएतनामचा ध्वज असलेले सनसाईन हे ४६,४२७ टन एलपीजी घेऊन न्यू मंगळूर बंदराच्या दिशेने येत आहे. या पुरवठ्यामुळे देशांतर्गत बाजारात स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई भासणार नाही आणि रिफायनरींचे काम नियमित सुरू ठेवण्यास मदत होणार आहे.