पुणे – चालू वर्षी मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या जिल्ह्यातील 233 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार दि. 30 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून, एप्रिलमध्ये अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे.
तहसीलदारांनी गावाचे नकाशे अंतिम करणे, स्थळपाहणी करून प्रभागांच्या सीमा निश्चितीकरण, प्रारूप प्रभागरचनेची तपासणी, प्रारूप प्रभागरचना प्रसिद्धी आणि त्यावर हरकती व सूचना मागविणे, प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सुनावणी आदी प्रक्रिया 30 जानेवारी ते 11 एप्रिलपर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 17 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रभागरचना अंतिम करून निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे. आयोगाकडून 25 एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचनेला मान्यता देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या ग्रामपंचायत शाखेकडून देण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यातील आंबेगाव-30, बारामती-32, भोर-27 , दौंड-11 , हवेली-4, इंदापूर-6, जुन्नर-26 , खेड-25, मावळ-20, मुळशी-23, पुरंदर-15, शिरूर-8 आणि वेल्हे-6 अशा एकूण 233 मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती आहेत.