पुणे: राज्यातील आषाढी वारी संदर्भांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची घोषणा केली आहे. कोरोनाचे वाढते संकट, रोज सापडणारे नवनवीन स्ट्रेन, तिसऱ्या लाटेचा दिलेला इशारा अशा परिस्थितीत आषाढी पायी वारीला यंदाही परवानगी देण्यात आली नाही. केवळ मानाच्या दहा महत्वाच्या पालख्या आहेत त्यांना बसने परवानगी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पालखी सोहळ्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या पालख्यांसाठी २० बस देण्यात येणार आहेत. तसेच पालखी सोबत असणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात येणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
यंदा पालखीच्या प्रस्थानासाठी देहू आणि आळंदीमध्ये 100 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. उरलेल्या 8 पालख्यांना प्रत्येकी 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
प्रत्येकी 2 बसमधून यंदाही मानाच्या पालख्या रवाना होणार आहेत. मानाच्या पालख्यांना वाखरीमध्ये पोहोचल्यावर दीड किलोमीटर प्रातिनिधीक पायी वारी करायला परवानगी देण्यात आली आहे. तसंच शासकीय महापूजा गेल्या वर्षीप्रमाणे होणार आहे. रिंगण आणि रथोत्सवासाठी केवळ १५ वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची एक बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पवार म्हणाले.