मुंबई – राज्यातील वाढत्या करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून संपूर्ण लाॅकडाऊनच्या हालचाली सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर आज रात्री साडोआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांकडून आज लाॅकडाऊनबाबतचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. तसेच नवीन एसओपी देखील जाहीर होणार असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून राज्यात लाॅकडाऊन लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून बैठकांचं सत्र सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही लाॅकडाऊन लागू करण्यास संमती दर्शवली आहे. दोन दिवसांपूर्वी कोविड टास्क फोर्सच्या बैठकीनंतर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर लाॅकडाऊनबाबत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. 15 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत हा लाॅकडाऊन असण्याची शक्यता आहे.