मुंबई : येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यावर याची अंमलबजावणी होईल. राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक आहे. त्यात यावर चर्चा होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
1 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आले आहेत. सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार होतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं उदय सामंत यांनी काल सांगितले होते. कुलगुरूंची बैठक पार पडली, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितला आहे. संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल. त्यामुळे 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे उदय सामंत यांनी सांगितले.