पारनेर (प्रतिनिधी) – दिल्लीत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिलेला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आपण आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला होता.
त्यानंतर हजारे यांनी आंदोलन करू नये, केंद्र सरकारला वेळ द्यावा, यासाठी भाजपच्या नेत्यांनी राळेगणसिद्धी येथे येवून हजारे यांची भेट घेतली होती. मात्र समाधान न झाल्याने हजारे आंदोलन करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी केलेली शिष्टाई अखेर निष्फळ ठरली आहे. हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचे रणशिंग फुंकले असून, राळेगणसिद्धी पुन्हा देशाच्या केंद्रस्थानी असणार आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी सभापती आ. हरिभाऊ बागडे व राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी (दि.21) राळेगणसिद्धी येथे येवून अण्णांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली.
आपल्या मागण्या शेतकरी हिताच्या असून, त्यासंबंधी चर्चेतून योग्य मार्ग काढण्यात येईल. आपले वय पाहता उपोषणाचा मार्ग अवलंबून नये, असा आग्रह या नेत्यांनी अण्णांना केला. पण गेल्या अनेक दिवस सरकार याप्रश्नी चालढकल करत आहे. त्यामुळे आता दिलेले आश्वासन पूर्ण करा, नाही तर आपण आंदोलनाच्या भूमिका ठाम आहोत, असा खरमरीत इशाराच अण्णा हजारे यांनी या शिष्टमंडळाला दिला.
हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता. 23 मार्च 2018 रोजी दिल्ली येथील रामलीला मैदान व 30 जानेवारी 2019 रोजी राळेगणसिद्धी येथे केलेल्या आंदोलनाच्या वेळी पंतप्रधान कार्यालय व तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले होते. पण दोन वर्षांत या आश्वासनाचे पालन झाले नसल्याची आठवण यावेळी अण्णांनी बागडे व डॉ. कराड यांना करून दिली.
केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला संविधानिक व स्वायत्त दर्जा देवून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला हमीभाव देण्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचे दोन वेळा दिलेले लेखी आश्वासन पाळले नसल्याने आता जीवनातील शेवटचे उपोषण करायचे ठरवले आहे. त्यासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानाची परवानगी मागीतली असल्याचे यावेळी हजारे यांनी सांगीतले.
राज्यातील कृषिमूल्य आयोगाने शिफारस केलेल्या वस्तूंच्या किमतीत केंद्र सरकारकडून कपात करण्यात येत असल्यानेच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येत असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.
…तर तेथे जगण्याचीही इच्छा नाही
45 वर्षे मंदिरात राहणाऱ्या एका फकिराला लिखित स्वरूपात दिलेले वचन केंद्र सरकारला पाळता येत नसेल, तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न अण्णा हजारे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच जेथे दिलेल्या आश्वासनांचे पालन होत नाही, तेथे आता जगण्याचीही इच्छा आपल्याला राहिली नाही, असा उद्विग्न इशाराही दिला.
लवकरच बैठकीचे आयोजन – डॉ. कराड
या प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला काही वेळ द्यावा. तसेच आपल्या प्रकृतीची काळजी वाटत असल्याने या वयात उपोषण करू नये, असा आग्रह यावेळी खासदार डॉ. भागवत कराड यांनी धरला. केंद्रीय पातळीवर चर्चा करून अण्णांच्या मागण्यांसंबंधी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही डॉ. कराड यांनी सांगीतले.