नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांना आपले पददेखील गमवावे लागले होते. दरम्यान, यापूर्वी दोन वेळा ईडी आणि सीबीआयने धाडी टाकल्या होत्या त्यानंतर आता आयकर विभागाने केलेल्या कारवाईमुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सकाळी 11.30 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली.
अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत. यापूर्वी दोन वेळा ईडी आणि सीबीआयने धाडी टाकल्या होत्या. आता दिल्ली आणि मुंबई येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून चौकशी सुरु केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं.
देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे.
टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.