मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच मुंबई मेट्रोच्या खर्चासंबंधी देखील निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे झाले आहे, त्यानुसार 15 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफच्या नियमाच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच मदतीसाठी दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टर करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या नियमानुसार हेक्टरी 6800 रुपये मदत देण्यात येते मात्र, आम्ही ती दुप्पट देणार आहोत. हेक्टरी आता 13600 रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई मेट्रो वाढीव खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. 2015 सालीच्या निर्णयानुसार 23 हजार कोटी रुपये खर्च येणार होता. मात्र आता त्याची किंमत वाढल्याने 10 हजार कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली आहे, आता हा 33 कोटी हजार रुपयांचा प्रकल्प झाला आहे. असे फडणवीस म्हणाले. तसेच स्थापत्य कामे 75 टक्के पूर्ण झाले आहे. कारडेपोचे काम 29 टक्के पूर्ण झाले आहे. पहिला फेज 2023 साली सुरु झाला पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याला आज मान्यता मिळाली आहे. 50 टक्के इक्विटीचे पैसे केंद्र सरकार देणार आहे. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यास 13 लाख लोक प्रतिदिवशी प्रवास करतील. तर 2031 पर्यंत 17 लाख लोक यातून दररोज प्रवास करतील. मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.