नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यातही बँकेच्या गव्हर्नरपदाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने शक्तीकांत दास यांच्या फेरनियुक्तीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शक्तीकांत दास पुढील आणखी ३ वर्षे आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम करणार आहेत. त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी संपत होता. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने त्यांच्या फेरनियुक्तीचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. करोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. अशातच शक्तिकांत दास यांनी या पदी राहिल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत मिळू शकते. शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली करोना काळात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात आणि विकासाचे समर्थ करणं, बिकट परिस्थितीत लिक्विडीटी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
शक्तीकांत दास याआधी अर्थमंत्रालयात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव होते. त्यानंतर त्यांची ११ डिसेंबर २०१८ रोजी आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा हाच ३ वर्षांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी संपत आहे. मात्र, या फेरनिुयक्तीने ते डिसेंबर २०२४ पर्यंत या पदावर काम करतील. त्यांनी अर्थविभाग, कर प्रणाली, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
शक्तीकांत दास यांनी याआधी जागतिक बँक, आशियन डेव्हलपमेंट बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक, आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँक या ठिकाणी भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे. अर्थमंत्रालयात असताना त्यांनी जवळपास ८ अर्थसंकल्प तयार करण्यात थेट भूमिका निभावलेली आहे. दास यांनी दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.