मुंबई – राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छूक उमेदवारांची लगबग सुरु आहे. मात्र आरक्षित जागांवर उमेदवारी दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार अनेक उमेदवारांनी व्यक्त केली आहे. अशातच आज निवडणुकांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येणाऱ्यांसाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.
येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुक होणार आहे. त्या अनुषंगाने जात पडताळणी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ऑनलाइन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. त्यामुळे 29 व 30 डिसेंबर या दोन दिवशी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने जात पडताळणीचे अर्ज स्विकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत.
अर्ज स्विकारण्याच्या खिडक्या वाढवाव्यात तसेच दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे. आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत, असे आदेश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत. सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
15 जानेवारीला 14234 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
असा असेल पुढील निवडणुक कार्यक्रम
– 23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी
– उमेदवारी मागे घेण्याची मुदत 31 जानेवारी
– उमेदवारांची अंतिम यादी 4 जानेवारी
– मतदान 15 जानेवारी
– मतमोजणी 18 जानेवारी