काळा कायदा तातडीने मागे घ्या : चव्हाण; शांती यात्रेचे संगमनेरमध्ये स्वागत
संगमनेर – देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे ढासळलेली असून वाढलेली महागाई, बेरोजगारी या मुद्यांवरील जनतेचे लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकार धार्मिक मुद्दे पुढे करीत आहेत. अर्थव्यवस्थेचे मोठे संकट देशावर असून आर्थिक मंदीसह नागरिकत्व कायद्याबाबत केंद्र सरकार पूर्णत: देशवासीयांशी खोटे बोलत असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या विरोधात सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या विरोधता एल्गार पुकारला असून त्यानिमित्त काढलेली शांती यात्रा आज संगमनेर शहरात आली. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. आशिष देशमुख, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, ऍड. माधवराव कानवडे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, विनायक देशमुख, रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आबासाहेब थोरात, शिवाजीराव थोरात, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, राजा अवसक, ऍड. निशाताई शिरूरकर आदी उपस्थित होते.
सिन्हा म्हणाले, कोणाला नागरिकत्व द्यायचे हा अधिकार पूर्णपणे भारत सरकारचा आहे. आता या नव्या कायद्याची गरज नव्हती, परंतु पूर्णत: हिंदुराष्ट्र करण्यासाठी काही लोकांची षडयंत्र आहे. या कायद्याने कुणालाही सुरक्षितता मिळणार नाही. जगामध्ये 54 देश इस्लाम धर्मीय असून मोजक्या देशाबाबत हे धोरण का धरले व श्रीलंकेतील अल्पसंख्यांकबाबत आपण का बोलत नाही. खरे तर देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था हीच मोठी चिंता आहे.या आर्थिक वर्षात जीडीपी 5 टक्के होऊ शकतो 1 टक्के जीडीपी म्हणजे 2 लाख कोटींचे नुकसान, 8 वरून जर जीडीपी 5 टक्क्यांवर आला तर सहा लाख कोटींचे देशवासीयांचे नुकसान होत आहे.
याबाबत सरकारला कोणताही मार्ग काढता येत नाही. या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी विषमतावादी धार्मिक मुद्दे पुढे करून सरकार जातीपातीचे राजकारण करत आहे. महात्मा गांधींचे विचार आणि भारताचे संविधान संपवण्याचा त्यांचा डाव आहे. याविरुद्ध विद्यार्थी व लोक रस्त्यावर उतरत असून 3 हजार किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा दिल्लीमध्ये केंद्र सरकारला जाब विचारणार आहे, असे ते म्हणाले.
चव्हाण म्हणाले की, पाचवर्षे भाजप सरकारने विरोधक संपविण्याचा डाव केला असून अशा लोकशाही विरोधी सरकारला सत्तेतून बाहेर करण्यासाठी विकासाच्या मुद्यावर महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले. केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचे देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात दूरगामी परिणाम होणार आहेत. भाजप सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून देशात प्रचंड अस्वस्थता आहे. सरकारने हा काळा कायदा तातडीने रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
आ. देशमुख म्हणाले, या कायद्याविरोधात जेएनयूसह देशातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, मात्र या विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देऊ पाहणारे अनेक उच्चपदस्थ अधिकारी व कुलगुरू सरकारने बदलले पाहिजे, अशी मागणी देशमुख यांनी केली.
आ. डॉ. तांबे म्हणाले, भाजप देशात द्वेषाचे राजकारण करू पाहत आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंध नाही, असे मुद्दे पुढे केले जात आहेत. देशात अल्पसंख्यांक समाज असुरक्षित असून विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण व्हावे. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर रणजितसिंह देशमुख यांनी आभार मानले.