नवी दिल्ली : देशातील बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून पळून गेलेल्या विजय माल्याला आता मोठा झटका बसला आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक गट आर्थिक माल्याच्या तीन कंपन्यांमधील शेअर होल्डिंग विकून किंगफिशर विमान कंपनीला दिलेले ६२०० कोटींपेक्षा अधिक कर्जाची वसुली करणार आहे.
यूनायटेड ब्रुवरीज लिमिटेड, यूनायटेड स्पिरिट्स लिमेटेड आणि मॅकडॉवेल होल्डिंग्स लिमिटेडमधील माल्या यांच्या वाट्याचे शेअर्स ब्लॉक डील्समध्ये २३ जून रोजी विकले जाणार आहेत. माल्या यांच्या मालकीची किंगफिशर एअरलाइन्स ही कंपनी ऑक्टोबर २०१२ पासून बंद आहे.
माल्याला २०१९ मध्ये कर्ज बुडवल्याप्रकरणी आणि बँकाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी देशातून पळून गेलेला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या माल्या ब्रिटनमधील न्यायालयांमध्ये त्याला भारताच्या ताब्यात देण्याची जी मागणी केली जातेय त्याविरोधात खटला लढत आहे.
जर खरोखरच माल्याच्या मालकीच्या शेअर्सची विक्री झाली तर बँकाकडून किंगफिशर एअरवेज कर्ज प्रकरणामध्ये विजय माल्याविरोधातील पहिली मोठी वसुली असेल. किंगफिशरला देण्यात आलेलं कर्ज हे २०१२ च्या शेवटी नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. माल्याने मार्च २०१६ मध्ये भारत सोडला. १७ बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
मनी कंट्रोलने काही कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार. या शेअर्सची विक्री बंगळुरुमधील डेट रिकव्हरी ट्रेब्युनल म्हणजेच डीआरटीच्या देखरेखीखाली होईल. या कंपनीकडे माल्याने घेतलेल्या ६२०३ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीची जबाबदारी देण्यात आलीय. ही विक्री पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे.
जर ब्लॉक डीलमध्ये या शेअर्सची विक्री झाली नाही तर बँक बल्क किंवा रिटेल माध्यमातून शेअर्सची विक्री करु शकते. किंगफिशरला कर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीमध्ये एसबीआयबरोबरच पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, इलाहाबाद बँक, फेडरल बँक आणि अॅक्सेस बँकेचा समावेश आहे.
या प्रकरणामध्ये विजय माल्याने मागील वेळेस प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या पत्रकामध्ये असा दावा केला होता की, त्याने जितके पैसे उधार घेतले आहेत त्यापेक्षा अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे. “मी टीव्ही पाहत आहे आणि सतत माझ्या नावाचा उल्लेख फसवणूक करणारा असा केला जातोय. कोणाला असं वाटतं नाहीय का किंगफिशर एअरलाइन्सकडे असणाऱ्या उधारीपेक्षा माझी अधिक संपत्ती ईडीने जप्त केलीय. मी अनेकदा १०० टक्के उधारी परत करण्यासंदर्भात भाष्य केलेलं नाही का? ही फसवणूक कशी झाली?,” असा प्रश्न माल्याने एका ट्विटमध्ये उपस्थित केलेला.