कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वीच आतापासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बंगालमध्ये राजकीय वर्चस्व असलेल्या तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ( suvendu adhikari resigns ) आज आमदारकीचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण घुसळून निघत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीला अद्याप बराच अवकाश असला, तरी आतापासून राजकीय हादरे सुरू झाले आहेत.
काही दिवसांपासून नाराज असलेले तृणमूलचे नेते सुवेंदू अधिकारी ( suvendu adhikari resigns ) भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. आज आमदारकीचा राजीनामा देत अधिकारी यांनी खळबळ उडवून दिली आहे.
अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीपासूनच सुवेंदू अधिकारी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मंत्रिपदापाठोपाठ अधिकारी यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्याने, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुढील काही दिवसांत अधिकारी भाजपात दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाने त्याच स्वागत केले आहे. त्याचबरोबर त्यांना भाजपात येण्याचे आवाहनही केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार अर्जून सिंह यांनी तृणमूल कॉंग्रेसचे पाच खासदार भाजपात येणार असल्याचा दावा केला होता. सौगत रॉय यांच्यासह पाच खासदार तृणमूलचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी त्यांनी सुवेंदू अधिकारी ( suvendu adhikari resigns ) यांच्या नावाचाही उल्लेख केला होता.