पाटणा – बिहारच्या दानापूरजवळ प्रवाशांनी खच्चून भरलेली एक जीप पुलावरून थेट गंगा नदीत कोसळून दहा जण मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पिकअप व्हॅनमधून जवळपास 20 जण प्रवास करत होते. यातील 9 जणांचे मृतदेह हाती लागले असून अद्याप जवळपास 11 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांच्या शोधार्थ ‘एनडीआरएफ’कडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
प्रवास करत असलेले बहुतांश प्रवासी अकिलपूरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. एका लग्न समारंभाहून परतत असताना गाडीच्या चालकाचा ताबा सुटला आणि पुलाची रेलिंग तोडून गाडी नदीत कोसळली. गाडीच्या टपावर बसलेल्या प्रवाशांनी मात्र वेळीच सावध होत आपले प्राण वाचवले मात्र जीपच्या आत बसलेल्या लोकांना गंगेत समाधी मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. घटनेनंतर या ठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. दानापूरचे आमदार रीतालाल यादव यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. कंत्राटदारांकडून येथील पुलाचे निर्माण चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्याचा आरोप होतो आहे. चढ असल्यानं अनेक गाड्या इथून घसरत असल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करण्यात आला.