नवी दिल्ली – देशांत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनात मागील 11 महिन्यात 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा करावी, अशी मागणी राकेश टिकैत यांनी केली. याबाबत ट्विट करत त्यांनी ही भूमिका मांडली.
आम्ही भारतीय शेतकरी मोदी सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहोत. आंदोलन करताना मागील 11 महिन्यात 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आम्हा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी हे कायदे मागे घेतले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत आमच्या प्रश्नांवर लक्ष द्याल, असे या ट्विटमध्ये टिकैत यांनी म्हटले आहे.
राकेश टिकैत यांनी “बायडन स्पिक्स अप फॉर फार्मर’ असा हॅशटॅगही वापला. इतकेच नाही तर टिकैत यांनी या आधीच्या एका ट्विटमध्ये अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये अनिवासी भारतीय शेतकऱ्यांनी मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्याविरोधात आंदोलन केल्याचेही ट्विट केले होते.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सक्रीय
शेतकरी नेते आणि भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारचा घंटा वाजणार असल्याचे सांगून हे वादळ पूर्वांचलकडे जाणार असल्याचा इशारा दिला. मागील 10 महिन्यांपासून शेतकरी देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकायला तयार नाही, असाही आरोप त्यांनी केला. ते बडनगरमध्ये बोलत होते.
बडनगरमधील घंट्याविषयी बोलताना ते म्हणाले की हा घंटा खराब झाला तर तो दुरुस्ती करण्याची जबाबदारी संघटनेची असेल. खराब झाल्यानंतर दुसरा घंटा लावत राहू. जोपर्यंत घंटा राहिल तोपर्यंत संघटना राहिल, टिकैत नाव राहिल. सरकार 10 महिन्यांपासून शेतकऱ्यांची मागणी ऐकत नाही. किमान घंट्याच्या निमित्ताने तरी ऐकेल अशी आशा आहे. ते हिंदुत्वाच्या नावावर निवडणुकीत तिकीट देणार आहेत. आम्ही घंटा वाजवला, शंखही वाजवला, आता या सरकारचा घंटा वाजणार आहे.