बिबट्या, वन विभागाला दोषी धरून प्रश्न सुटणार का?
अवसरी – सध्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढू लागली आहे. सगळीकडेच बिबट्याचीच चर्चा ऐकावयास मिळत आहे. याबाबत नागरिकांमध्ये विवेचन, विश्लेषण आणि त्यावर जनजागृती होणे गरजेचे आहे.
विनाकारण बिबट्या आणि वन विभागाला दोषी धरून हे प्रश्न सुटणार आहेत काय? याचा विचार सर्वसामान्य जनता आणि शासनाने करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर नागरिकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद देणे तितकेच गरजेचे आहे.
बिबट्या हा प्राणी मुळातच लाजाळू आणि चपळ आहे. भौगिलिक परिस्थितीनुसार बिबट्यांच्या खाद्यामधे बदल होत असतो. बिबट्यांचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी. शेळी, मेंढी, बकऱ्या, गुरे, कुत्रे, माकडे, उंदरांसारखे कृंतक प्राणी, उभयचर, पक्षी व किडेदेखील खातात. कधीकधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीसुद्धा खातात. बिबट्या हा आपल्या पेक्षा कमी उंचीच्या प्राण्यावर हल्ला करतो. कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच आजच्या परिस्थितीत बिबट्या मनुष्यवस्तीत येण्याच्या घटना घडत आहेत.
- शासनाने जनजागृती करण्याची गरज
- नागरिकांचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा
कुत्र्यांची वाढती संख्या त्यामुळे बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्ती पर्यत येतो. त्यामुळे या भागात वावरताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. बिबट्याचा ग्रामीण भागात वाढता वावर हा धोक्याचा ठरू लागला आहे. त्यामुळे नीागरिकांनी बिबट्याला मानवी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी त्याला हवे असलेली संसाधने कमी करण्यावर भर दिला पाहिजे. मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे.
निसर्गावर अतिक्रमण केल्याने जंगले नष्ट होऊ लागली. आंबेगाव तालुक्यात बारमाही पाण्याची उपलब्धता झाल्याने ऊस लागवडी खालील क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. घोड नदीवर असणारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यात नेहमी पाणी असल्याने वन्य प्राण्यांना निवारा आणि पाणी सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे वन्य प्राणी हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर जंगल असले तरी त्या प्रमाणात उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच अन्य बिबट्याचे भक्ष असणारे वन्य प्राणी देखील कमी झाले असल्याने बिबट्याने नदीकाठचा भागात वास्तव्य केल्याचे आढळत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केलेली ठिकाणे पाहिली तर चास, नारोडी, घोडेगाव, कळंब, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, पारगाव, शिंगवे, जांबुत, पोंदेवादी अशा भागातील पाळीव प्राणी आणि माणसांवर हल्ला झालेला दिसून येत आहे. या भागात उसाचे क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी ऊस तोडणी सुरू झाली आहे. त्यामुळे बिबट्याचे नैसर्गिक राहण्याचे ठिकाण नाहीसे होत आहे. त्यात जर बिबट मादी पिल्लासह असेल तर त्या ठिकाणी बिबट हल्ला करू शकतो. त्यामुळे उसतोडणी करताना सुद्धा ऊस तोडणी कामगारांनी उजाडल्यावरच आणि ग्रुपनेच ऊस तोडणी करावी.
निसर्गात माणसांचा हस्तक्षेप वाढला आहे. बिबट्याला नियमित जागेची अचूक माहिती असते. वातावरणात निसर्ग चक्र हे ठरलरले असते. बिबट्या हा जंगलात राहणारा जंगल तोड झाली त्यामुळे लहान जंगली प्राणी जंगलातून हद्द पार झाले .त्या मुळे बिबट्याला अगर इतर वन्य प्राण्याला अन्न आणि निवाऱ्यासाठी मानवी वस्तीमधील ऊस शेतात येऊ लागला आहे. भुकेमुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्या नागरी वस्तीत येतो. म्हणून जंगले टिकवली पाहिजेत.
नागरिकांनी वास्तव्य करताना शेतीच्या बांधापासून काही अंतरावर घर बांधावे. आपले पाळीव प्राणी बंदीस्त गोठ्यात ठेवावेत. गोठ्याच्या परिसरात पुरेसा प्रकाश असावा. रात्री मळ्याकडे अगर शेतात जाणे टाळावे. रात्री काम असेल तर हातात घुंगराची काठी , उजेडासाठी बॅटरी, मोठ्या आवाजात रेडिओ घेऊनच बाहेर पडावे. एकटे बाहेर पडू नये. लहान मुलांना एकटे बाहेर पडू देऊ नये. बिबट्या समोर आलात तर घाबरून न जाता मोठ्याने आरडाओरडा करावा. घाबरून पळू नये.
-योगेश महाजन, वन परिक्षेत्र अधिकारी मंचर-घोडेगाव.