नवी दिल्ली – न्यायालयाच्या अवमान प्रकरणी प्रसिद्ध विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले निवेदन आज न्यायालयाने फेटाळले. भूषण यांनी न्यायालयाची माफी मागण्यासाठी सादर केलेले निवेदन उर्मट असल्याचे सांगून न्यायालयाने त्यांना फेरविचार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला.
न्यायालयाचा अवमान करणाऱ्या दोन ट्विट प्रकरणात भूषण यांना दोषी ठरवण्यात आले आहे. आज त्यांना शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र त्यांनी न्यायालयाची माफी मागणारे निवेदन सादर केल्यावर त्याबाबत फेरविचार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. भूषण यांनी आपल्या वकिलाशी चर्चा करून मगच निवेदन सादर करावे, असे न्या. अरुण मिश्रा यांनी सांगितले.
भूषण यांना यापूर्वीच दोषी ठरवण्यात आले असल्याने त्यांना कोणतीही शिक्षा देण्यात येऊ नये, अशी विनंती ऍटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला केली. मात्र जोपर्यंत भूषण माफी न मागण्याची भूमिका सोडून देत नाहीत, तोपर्यंत वेणुगोपाल यांच्या विनंतीचा विचार करता येणार नाही.
भूषण यांनी सादर केलेल्या निवेदनाचा सूर, रोख आणि तपशील अतिशय वाईट आहे. ही माफी आहे की संताप व्यक्त केला आहे, असेही न्यायालयाने सुनावले. जर चुकीची खरोखर जाणीव झाली असेल, तर त्याबाबत सौम्यपणा दाखवता येऊ शकेल, असे सांगून न्यायालयाने पुढील सुनावणी 24 ऑगस्ट रोजी निश्चित केली.