मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटातील प्रमुख नेते आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ ठाकरे गटाला दुसरा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे दीपक सावंत यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर आता ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर कडक शब्दात टीका केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी या नेत्यांच्या प्रवेशाविषयी बोलताना,“ज्यांचे हात बरबटलेले आहेत तेच लोक शिंदेसोबत जातात. दीपक सावंत असतील किंवा भूषण देसाई असतील, ज्यांचे हात बरबटलेले आहेत तेच असा मिंदेपणा करून पक्षाला सोडून जातात. आमच्यासारखे करोडो लोक स्वतःला वाहून घेऊन शिवसेनेसोबत निस्वार्थ भावनेने काम करतात. हे शिवसैनिकच आमची खरी संपत्ती.” असे म्हटले आहे.
पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या आणि शिंदे गटाची वाट धरणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक होत विनायक राऊत म्हणाले की, “अशा या भाडोत्री लोकांच्या जीवावर आमचा पक्ष नाही.” जवळपास आठ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. सोबत शिवसेनेचे ४० आमदार नेले. हे आमदार आणि भाजपाच्या पाठींब्यावर राज्यात सत्तास्थापन केली. त्यानंतरही शिवसेनेचे अनेक नेते शिंदे गटात जात आहेत.