नवी दिल्ली – भाजपच्या राजवटीत सारा उत्तरप्रदेश आज भीतीच्या सावटाखाली आहे. या सरकारच्या राजवटीच्या विरोधात जो कोणी आवाज उठवतो त्याचा आवाज दाबून टाकला जातो आणि त्यांच्यावर कारावासाचीही कारवाई होत आली आहे असा आरोप कॉंग्रेसचे उत्तरप्रदेशचे निरीक्षक भुपेश बघेल यांनी केला आहे.
आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी हे पक्ष भाजपशी आतून हातमिळवणी करीत आहेत. तथापी एकटी कॉंग्रेसच भाजपच्या दडपशाहीच्या राजवटीच्या विरोधात सक्षमपणे लढत आहे.
उत्तरप्रदेश निवडणुकीचा निकाल अनेक राजकीय पंडितांना चकवा देणारा ठरेल असा दावाही त्यांनी केला. मोदी सरकारने उत्तरप्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले पण तरीही त्यांना याचा राजकीय लाभ उठवता येणार नाही कारण या पक्षाने शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे असा आरोपही त्यांनी केला.
तीन काळे कृषी कायदे करून मोदी सरकारने जे दुष्कृत्य केले आहे त्याचा परिणाम इतक्यात नाहीसा होण्याची शक्यता नाही असेही ते म्हणाले.