भूईंज – रोज व्यायामासाठी सायकलवरून 30 कि. मी.चा प्रवास करणाऱ्या भुईंज येथील सहा साहसी युवकांनी तब्बल 400 किलोमीटरचे अंतर 19 तास 25 मिनिटांत पूर्ण केले. युवकांच्या या साहसाचे परिसरात कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भुईंज येथे सायकलवेडे ग्रुपच्या सागर दळवी, योगेश शिर्के, अनिल लोखंडे, घनश्याम जाधवराव, संतोष मोरे आणि सर्वात लहान असलेल्या गौरव जाधवराव या साहसी युवकांनी ही मोहीम पार केली. दररोज पहाटे भुईंज ते वेळे अशी तीस की. मी.ची सायकल दौड करणाऱ्या या सायकल वेड्यांनी आतापर्यंत पाचगणी, कास, कोल्हापूरपर्यंत सायकल दौड केली आहे. यातून वाढलेल्या आत्मविश्वासातून त्यांनी थेट पणजी गोव्याची मोहीम आखली. सुरुवातीला त्यांना लोकांनी वेड्यात काढत, सायकलवरुन कुणी इतक्या लांब जातं का? असे टोमणे मिळाले.
पण त्याच्या शतपटीने प्रोत्साहन, शुभेच्छा मार्गदर्शन सहकार्य देणाऱ्यांचीही मोलाची मदत झाली. या मोहिमेतील अडचणी, राहण्याची सोय, बॅकअप कार, सायकल मेंटेनन्स आणि सायकल स्वारांचा फीटनेस ही सर्व पूर्वतयारी करण्यात आली. टिम लिडर योगेश शिर्के आणि संतोष मोरे यांनी ती जबाबदारी पार पाडली. त्याचबरोबर विजयसिंह जाधवराव यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत मोहिमेतील पहिल्या दिवशीच्या मुक्कामाची सोय संजय गुंजाते यांच्याकडे हिरलगे या ठिकाणी केली.
प्रत्यक्ष एकूण 19 तास 25 मिनिटं सायकलिंग करून हे साहसी युवक कलांगुट बीच वर पोहोचले आणि ध्येय साकारले. सर्व प्रवासादरम्यान पायलट म्हणून आपल्या चार चाकी वाहनासह धनंजय भोसले यांचे सहकार्य लाभले. या यशस्वी कामगिरीबद्दल या साहसी युवकांचे परिसरात कौतुक होत असून अनेकांसाठी त्यांची ही मोहीम प्रेरणादायी व आरोग्य जागृतीचे नवे पर्व सुरू करणारी ठरत आहे.