भोर – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी भोर व वेल्हे तालुक्यांना जोडणाऱ्या सर्व सीमा मंगळवारी (दि. 14) मध्यरात्रीपासून बंद करण्यात आल्या असल्याची माहिती भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली.
सध्या सर्वत्र लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळातही पुणे-मुंबईसह इतर शहरातून भोर व वेल्हे तालुक्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होत नाही. याशिवाय अनेकजण अत्यावश्यक सेवाच्या नावाखाली पुण्याकडे जाताना दिसत आहेत. त्यामुळे करोना विषाणुचा प्रसार होण्याची शक्यता विचारात घेवून हा निर्णय घ्यावा लागला असून तशा सूचना पोलिसांना दिल्या असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. लॉकडाऊनच्या काळात भोर-22 हजार तर वेल्हे तालुक्यात 15 हजार नागरिक बाहेरुन आले आहेत.