आमदार थोपटेंच्या समर्थकांची जोरदार मागणी
भोर – भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी आमदारकीची “हॅट्ट्रिक केली आहे, त्यामुळे त्यांना यंदा मंत्रिपद नक्की मिळेल, अशी आशा भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील जनतेसह कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आहे. जर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात आमदार थोपटेंना स्थान मिळाल्यास तब्बल 25 वर्षांनंतर भोर विधानसभेला पुन्हा एकदा “लाल दिवा’ मिळणार असल्याने मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे भोर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना नवी उर्जा मिळाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आमदार संग्राम थोपटे यांना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे. दरम्यान, देशात, राज्यात 2014 मध्ये मोदी लाट असतानाही जिल्ह्यातून कॉंग्रेस पक्षाकडून ते एकमेव आमदार म्हणून निवडून आले होते. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात 21 आमदार व 4 खासदार जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. तर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या चार जिल्ह्यांत 36 आमदार व 5 खासदार आहेत. तर या चार जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात आमदार अधिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कॉंग्रेसला पर्यायाने भोर विधानसभा मतदारसंघाला मंत्रिमंडळात स्थान मिळालेच पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.
माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे लोकनेते अनंतराव थोपटे यांचे पक्ष संघटनेत मोठे योगदान आहे. त्यांचा वारसा आजही आमदार संग्राम थोपटे हे समर्थपणे जोपासत आहेत. त्यांचे स्मरण राज्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांना असून यावेळी आमदार संग्राम थोपटे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यास कॉंग्रेसला जिल्ह्यात गत वैभव प्राप्त होऊ शकेल, असा सूर भोर विधानसभेतील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या 45 ते 50 वर्षांत अनेकदा चढउतार झाले मात्र, माजी मंत्री अनंतराव थोपटे हे कधीही विचलित न होता, कॉंग्रेससोबत ठाम निष्ठेने उभे राहिलेले आहेत. असे असताना गेल्या 25 वर्षांत भोरचा मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्याने मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प रखडलेलेच आहेत.
या रखडलेल्या प्रकल्पांना पुन्हा बळ देण्यासाठी भोर विधासभा मतदारसंघाला मंत्रिपदाची आवश्यकता आहे. आणि जर हे मंत्रिपद आमदार थोपटे यांना मिळाल्यास ते त्यांच्या कल्पकशक्तीने हे रखडलेले प्रकल्प आणखी नवीन प्रकल्प या मतदारसंघात खेचून आणतील. तसेच या प्रकल्पांद्वारे ते या मतदासंघातील युवकांना नवीन रोजगाराच्या वाटा निर्माण करून देतील, असा विश्वास भोर मतदारसंघातील तरुणांसह नागरिकांना आहे, त्यामुळे ते एकमुखी मंत्रिपदाची मागणी करीत असल्याचे थोपटे समर्थकांचे म्हणणे आहे.
बाळासाहेब थोरात शब्द पाळणार!
विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचाराचा नारळ भोर येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते फोडण्यात आला होता. त्यावेळी थोरात म्हणाले होते की, राज्यात कॉंग्रेसची सत्ता आली, तर आमदार संग्राम थोपटे यांचा मंत्रीमंडळात समावेश करुन भोर तालुक्याला लाल दिवा दिला जाईल, असे जाहीर आश्वासन दिले होते, त्यामुळे थोरात आपला शब्द पाळतील अशी खात्री कार्यकर्तांना आहे.
…तर हे प्रश्न मार्गी लागतील
आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रीपद दिले गेल्यास भोर तालुक्यातील औद्योगिक वसाहत, धोम-बलकवडी धरण प्रकल्पातील व नीरादेवघर धरण प्रकल्पातील रखडलेली कालव्यांची कामे व यासह नागरी विकासाची कामे मार्गी लागणार असून प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी दिलेला शब्द पाळावा अशी अपेक्षा कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.