चिंबळी -भिरर्र… धावपट्टीवर जुंपत असलेली बारी… बारीचे मालक आहेत… झाली भिरर्र… अरे वा… वा… वा… टाक उचल की टाक… सेकंद बारा… बारा… बारा… असा पहाडी आवाज सध्या दुर्मिळ झाला आहे. मात्र, गेल्या दिवासांपासून सर्वपक्षीय नेते बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी एकत्रित आणि मनापासून प्रयत्न करत असल्याने बैलगाडा चालक मालक, तसेच गाडा शौकीनांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
बैलगाडा शर्यती वरची बंदी कधी उठवली जातेय, आणि भिरर्रची… आरोळी कधी सुरू होतेय, याची प्रतीक्षा आता सर्वांना लागली आहे. बैलगाडा शर्यत केवळ मनोरंजनाचे खेळ नसून, या शर्यतीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे. बैलगाडा मालक, छोटे मोठे व्यापारी, वाहन व्यवसायिक, आईस्क्रीम, लस्सी विक्रेते, गाडा तयार करणारे कारागीर,
खाद्य पदर्थ विक्रते, हॉटेल व्यावसायिक आदींचा रोजगार या शर्यतींवर अवलंबून आहे. गावोगावच्या ग्रामदैवत यात्रा, उत्सव आदींमध्ये परंपरागत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून त्या माध्यमातून आनंद लुटला जात होता. कालांतराने बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांचा छळ होत असल्याची प्रकरणे समोर आली.
त्यामुळे तब्बल 400 वर्षांची ही परंपरा कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. सर्वोच्च न्ययालयाने सध्या शर्यतीवर बंदी घालून सात वर्षे पूर्ण होत आहेत. परिणामी यात्रा जत्रांचा उत्साह मावळत चालला आहे. शर्यतीवर अवलंबून असलेल्या गरीबांचा रोजगारही आता पूर्णपणे बंद झाला आहे.
शौकिनांना आशा
बैलगाडा शर्यत बंदीनंतर आजही बऱ्याच गाडा मालकाच्या दावणीला शर्यतींचे बैल, घोडा, घोडी सांभाळली जात आहेत. या शर्यती सुरू होण्यासाठी नियम व अटी घालून परवानगी देणे गरजेचे वाटते. त्यामुळे यात्रा जत्रांना मोठी मजा येईल, असे मतही बैलगाडा शौकिनांनी व्यक्त केले.
बैलगाडा शर्यतीचा इतिहास –
2007 : ऍनमल इक्वॅलिटी ऑफ इंडियाच्या अनिल कटारियाची शर्यती विरोधात न्यायालयात धाव.
2007 : बैलांचा छळ थांबविण्यासाठी अशा शर्यतींवर बंदी घालण्याच्या सूचना उच्च न्यायालय सरकारला जारी.
2011 : केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाकडून बैलगाडा शर्यतीवर बंदी, अधिसूचना काढून शर्यती बंद. तसेच बैलाचा संरक्षित प्राण्यांच्या यादीत समावेश.
2012 : मुंबई उच्च न्यायालयाकडून शर्यतींवर पूर्णपणे बंदी.
2016 : केंद्राकडून वन आणि पर्यावरण विभागाची अधिसूचना रद्द.
016 : 2016 च्या विरोधात प्राणी प्रेमींकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. तातडीने पुन्हा शर्यतींवर बंदी.
2016 : बैलगाडा शर्यती पूर्ववत करण्यासाठी विविध ठिकाणी बैलगाडा चालक, चालक संघटनेची स्थापना. राज्य व केंद्रपातळीवर पाठपुरवठा.
2019 : बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी आजी-माजी खासदारांसह विविध बैलगाडा संघटनांचा पाठपुरावा.
2021 : सर्वपक्षीय नेते बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटविण्यासाठी एकवटले.