संतोष पवार
उत्कृष्ट प्रभाग 10 हजार, जिल्हा परिषद गट 50 हजार, जिल्हास्तरावर 10 लाखांची बक्षीसे
सातारा – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धांतर्गत जिल्ह्यात सध्या तपासणी सुरु आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटातील उत्कृष्ट प्रभागास 10 हजार रुपये, प्रत्येक गटातील एका उत्कृष्ट गावास 50 हजार रुपये, जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकास पाच लाख, द्वितीय क्रमांकास तीन लाख, तृतीय क्रमांकास दोन लाख रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक गावांनी सहभाग घेतला असून बक्षिसांसाठी जोरदार रस्सीखेच असल्याचे दिसत आहे.
सातारा जिल्हा परिषदेने निर्मल ग्राम अभियान, हागणदारीमुक्त अभियानात देशात नावलौकिक मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी विभागांतर्गत पंचायत समिती, ग्रामपंचायतींशी समन्वय साधून जिल्ह्यात स्वच्छता अभियानात उठावदार असे काम झाले आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल जिल्हा परिषदेला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. स्वच्छतेचे महत्व नागरिकांना पटावे यासाठी या अभियानांतर्गत जनजागृतीचे काम करण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून गाव पातळी ते जिल्हा पातळीपर्यंत या कामाची दखल घेवून स्वच्छतेमध्ये चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यासाठी शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सुरु केली आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या 1496 ग्रामपंचायती राष्ट्रसंत तुकडोजी स्वच्छ ग्राम अभियान स्पर्धेत सहभाग नोंदवतात.
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या उत्कृष्ट प्रभागास शासनाकडून 10 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या प्रभागाची निवड ग्रामपंचायत स्तरावरील समितीकडून दि. 21 ते 31 ऑक्टोबर या दरम्यान करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. जिल्हा परिषद गट स्तरावर प्राथमिक तपासणी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष विस्तार अधिकारी असून अंगणवाडी सेविका, आरोग्य पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख (शिक्षण) हे सदस्य असणार आहेत.
प्राथमिक तपासणी समितीकडून प्राप्त होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या अहवालाची तपासणी करुन प्रत्येक गटातील पहिल्या तीन ग्रामपंचायतीची निवड करण्यासाठी द्वितीय तपासणी समिती नेमण्यात आली आहे. गटविकास अधिकारी या समितीचे अध्यक्ष असून तालुका आरोग्य अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपअभियंता (पाणीपुरवठा), विस्तार अधिकारी हे या समितीचे सदस्य आहे.
(गुड मॉर्निंग पान 3 वर)
सातारा जिल्ह्याने निर्मल ग्राम, हागणदारीमुक्त अभियानात केलेल्या कामामुळे जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढला आहे. या अभियानाची शासनाकडून जोरदार जनजागृती होत असल्याने लोकांमधूनही आता उठाव होवू लागला आहे. गावोगावी, खेड्यापाड्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाने भरारी घेतली आहे. हे अभियान यशस्वी करुन जिल्ह्याचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.
संजय भागवत , मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सातारा