भोरगिरी भीमाशंकर परिसरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भिमानदीला महापूर
रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर : भोरगिरी भीमाशंकर परिसरासह तालुक्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे भिमानदीला महापूर आला आहे.चास कमान धरणातून 50 हजार क्यूसेस वेगाने पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीला मोठा पूर आला आहे. धरणाखालील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने “रेड अलर्ट “जाहीर करला आहे.
गेली दोन दिवसापासून भीमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे आज रात्री अतिवृष्टी झाली यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सुमारे 500 पेक्षा जास्त मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. भिमानदीच्या पुरात मोठी वाढ झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.रस्त्यांवरील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सुदैवाने नागरिक बाहेर पडले नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धरणाखालील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने धोक्याचा इशारा देण्यात आला आहे .चास कमान धरणाचे अभियंता उत्तम राऊत यांनी सांगितले की भोरगिरी भीमाशंकर परिसरात अतिमूसळधार पाऊस पडत असल्याने धरणातून 50 हजार क्यूसेस वेगाणे पाणी खाली सोडले जात आहे. पावसाच्या प्रमाणात वाढच होत असल्याने अजूनही जास्त कुलयुसेस वेगाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल.नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.
सलग बारा ते १५दिवसांपासून भोरगिरी भीमाशंकर परिसरातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत असताना काल पासून या परिसरात अतिवृष्टी होत असल्याने भुसक्कलनाची भीती असलेल्या पदरवाडी, भोमाळे आणि जावळेवाडी गावातील नागरिक भीतीच्या छायेत असून पाभे गावाला भिमानदीच्या पाण्याचा विळखा पसरला असल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. पावसाचा जोर अजूनच वाढत असल्याने
नद्या ओढे नाले यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून पुराचा आढावा घेतला जात आहे. तालुक्यातील पाभे, भोमाळे, पदरवाडी, जावळेवाडी या गावांवर लक्ष असून नागरिकांच्या अधिकारी संपर्कात आहेत. या भागात गेली दहा दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्याने माळीण सारखी दुर्घटना घडल्यास बचाव कार्यात अडथळे होणार आहेत. वीज पुरवठा व मोबाईल सुविधा सुरळीत करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत असून याकडे वीज वितरण विभाग व बीएसएनए ल चे अधिकारी लक्ष देत नसल्याने याभागात नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.दुर्घना घडल्यास या अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरावे अशी आदिवासी नागरिकांची मागणी आहे.
दरम्यान राजगुरूनगर शहरातील नव्याने बाधण्यात आलेल्या केदारेशर जवळील नव्या पुलावर भीमा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. पुलावर सेफी काढणाऱ्यांची संख्या वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे तर सेल्फी काढताना पडल्यास वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.पोलीस प्रशासन व नगर परिषदेकडून येथे सुरक्षा ठेवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.