तळेगाव ढमढेरे – विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील भीमा नदीला प्रथमच जलपर्णीचा विळखा पडला आहे. साधारणपणे ऑक्टोबरनंतर आलेल्या धरणातील आवर्तनातून पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीच्या उपनद्या भामा, इंद्रायणी, वेळ नदी, यामधील जलपर्णी भीमा नदीत पसरल्याचे दिसून येत आहे. तसेच भीमा नदीकाठच्या गावांमधील नवीन झालेले मोठे गृहप्रकल्प, कारखाने, औद्योगीकरण यामधील सांडपाणी व रसायन युक्त घटक, भीमा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे भीमा नदीतील जलप्रदूषण वाढले आहे.नदीतील जलचर, मासे, नदीकाठावरील कृषिपंप, शेजारी असणाऱ्या गावांमधील पाणीपुरवठा योजना यांना जलप्रदूषण समस्येचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण निवारण मंडळ व पर्यावरण विभाग यांनी वेळेत लक्ष घालावे. एकीकडे नदी स्वच्छता अभियान राबवले जात आहे तर दुसऱ्या बाजूला स्वच्छ नद्यांमध्ये रसायनयुक्त पाणी, गृह प्रकल्पाचे सांडपाणी, कचरा यामुळे नद्यांमधील जलप्रदूषण वाढत आहेत. नदी प्रदूषण रोखण्यासाठी स्वयंशिस्तीची गरज आहे. स्थानिक प्रशासन, राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. त्यातून सांडपाणी व कचऱ्यावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कारवाईची आवश्यकता आहे.
नदी बचाव मोहीम, नदी महोत्सव हाती घेऊन नदी स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढवणे गरजेचे आहे. अन्यथा विष वाहून नेणारी भीमा नदी नागरिकांच्या आरोग्यापुढे जटिल समस्या होणार आहे. अनेक गावांच्या पाणी योजना या नदीवरून आहेत. मुळात नद्यांचे दूषित पाणी आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांचा अभाव यांमुळे दूषित पाण्याचाच पुरवठा होत आहे.
नागरिकांमधील आणि स्थानिक प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे नदी प्रदूषण गतीने होत आहे. नदीमध्ये थेट टाकणारा कचरा आणि थेट सोडण्यात येणारे सांडपाणी, मैलामिश्रित पाण्यामुळे भीमा नदीची वाईट अवस्था झाली आहे. तरीही अधिकाऱ्यांनी दखल घेऊन भीमा नदी स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.