मुंबई: भीमा कोरेगाव प्रकरणी एल्गार परिषदसंदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार असून एएनआय’ची टीम पुण्यात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे कोरेगाव भीमा प्रकरणी एसआयटीची स्थापना करा अशी विनंती करणारे पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. मात्र त्याआधीच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवले. दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरण भाजपनेच घडविल्याचा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
देशमुख म्हणाले, भीमा कोरेगाव हिंसाचारामागे भाजपचा हात असून वास्तव समोर येईलचं मात्र भाजप घाबरत आहे. १०० टक्के या प्रकरणामागे भाजपचा हात आहे. दरम्यान त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली. एनआयए’ला सहकार्य करा नाहीतर राज्य सरकार बरखास्त करू, असे विधान मुनगंटीवार यांनी केले होते. त्यामुळे हिंसाचारामागे भाजपचा हात असल्याचे स्पष्ट होते.
एसआयटीकडे तपस दिला असता तर भाजप समर्थक अडकले असते, या भीतीमुळे राज्य सरकारला विश्वासात न घेता एएनआयकडे तपास सोपवल्याचे गृहमंत्री म्हणाले. दरम्यान, फडणवीस सरकारने कुणाला पाठीशी घातले असेल तर तुम्ही गृहमंत्री आहात कारवाई करा आणि केलेले आरोप सिद्ध करा, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
आज एनआयएने हिंसाचाराचे अर्ज, कागदपत्र मिळवण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ. तसेच तपास एएनआय’ला देण्यासंदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा करू. तपास एएनआय’ला देण्यासंदर्भात कोणतेही पत्र मिळाले नव्हते मात्र आता पत्र मिळाले असल्याचे गृहमंत्री म्हणाले.