वाराणसीतून मोदींविरोधात न लढण्याचा निर्णय
नवी दिल्ली – भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी बुधवारी घूमजाव करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला. दलित समाजाच्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी सप-बसप-रालोद महाआघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
चंद्रशेखर यांनी मागील महिन्यात उत्तरप्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावरून बसपच्या प्रमुख मायावती यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. दलित मतांचे विभाजन करण्याचा इरादा असणारे चंद्रशेखर भाजपचे हस्तक आहेत, असा आरोप मायावतींनी केला होता. त्यापार्श्वभूमीवर, चंद्रशेखर यांनी त्यांचे मन बदलल्याच्या घडामोडीला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, महाआघाडीने वाराणसीमधून बसपचा ब्राह्मण चेहरा असणाऱ्या सतीशचंद्र मिश्रा यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी चंद्रशेखर यांनी केली. मायावती यांच्याबरोबरचे शाब्दिक युद्ध कायमस्वरूपी थांबवण्याची माझी तयारी आहे. त्या पंतप्रधान बनाव्यात अशी आमची इच्छा आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.