चंद्रभागेला भक्तीचा महापूर : पालखी सोहळे पंढरीत दाखल
सोलापूर – पंढरीचा महिमा ।
देतां आणीक उपमा।।1्।।
ऐसा ठाव नाहीं कोठें ।
देव उभाउभी भेटे ।।धृ।।
या भावनेतून सावळ्या विठुरायाच्या आढीने आणि आषाढी यात्रेच्या अनुपम सोहळ्यात सहभागासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येथे दाखल होत आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे पंढरीनगरीत भक्तीचा महापूर ओसंडून वाहत आहे.
वीस दिवसांपासून सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे सायंकाळी पंढरीत दाखल झाले आहेत. यात्रेसाठी येथे आधीच दाखल विविध संतांच्या लहान, मोठ्या पालख्या, दिंड्या दशमीच्या दिवशी पंढरीच्या सीमेवर वाखरी येथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागतासाठी जातात.
बुधवारी, आषाढ शुध्द नवमीला सायंकाळपर्यंत रेल्वे, एसटी, खासगी वाहनांनी भाविक येथे दाखल झाले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यांचे आषाढ शुध्द दशमी, गुरुवारी सायंकाळी पंढरीत आगमन झाले. यात सहभागासाठी येथे दाखल भाविकांमुळे विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग पत्राशेडपुढे स्वेरी महाविद्यालयापर्यंत गेली होती. दर्शनासाठी 12 तासांचा कालावधी लागत होता.
शहरातील विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड, भक्तिमार्ग, कैकाडी महाराज मठ, तनपुरे महाराज मठ, रेल्वे स्टेशन परिसरात वारकऱ्यांची मोठी वर्दळ होती. हटवलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते प्रशस्त झाल्याने गर्दी असूनही ती रस्त्यांवर फारशी दिसत नाही.
परिणामी, वाहतुकीची कोंडी झाली नाही. स्टेशन रस्ता ते महाद्वार घाट, संपूर्ण प्रदक्षिणा मागार्वर पोलीस बंदोबस्त आहे. स्टेशन रस्त्याला शहरातील इतर रस्ते जेथे मिळतात तेथे पोलिसांनी सुरक्षा कठडे उभारून आतील रस्त्यावरुन येणाऱ्या वाहनांना मज्जाव केला आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने सज्ज केली आहेत.
स्वेरीपर्यंत पोहोचली दर्शन रांग
आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिरातील सभामंडपात रंगीबेरंगी आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशाने मंदिरातील सभामंडप उजळून निघालेला दिसत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने 80 कोटी रुपये खर्चून भक्तिमार्गावर बांधलेल्या भक्तनिवासात भाविकांची गर्दी आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणांसह या भक्तनिवासात विठ्ठलाच्या लाइव्ह दर्शनासाठी स्क्रीनची व्यवस्था केली आहे. त्यामुळे भक्तनिवासाच्या अलिशान लॉनवर बसून वारकरी विठ्ठल दर्शनाचा आनंद लुटत आहेत.
नवमीच्या दिवशी गर्दी कमी
यंदा भाविकांची संख्या काहीशी रोडवल्याचे दिसत आहे. दरवर्षी नवमीच्या दिवशी असणारी गर्दी यंदा ती दिसत नाही. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. यात्रेतील उलाढालीवरच त्यांचे पुढील काही महिन्यांचे प्रांपचिक नियोजन अवलंबून असते. दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे समाधानाचे वातावरण असले तरी व्यापाऱ्यात नुकसानीचीही भीतीही दिसली.