1 जूनपर्यंत केबिन राहणार बंद
सातारा – सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता भाऊसाहेब पाटील यांचे केबिन त्यांच्या रजेमुळे चक्क एक जूनपर्यंत बंद राहणार आहे. भाऊसाहेबांना वगळून राज्य संवर्गाच्या कनिष्ठ अभियंत्याकडून थेट प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलला सरकावण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. आवास योजनेच्या फाईलवर सही न करण्याची राजकीय शिक्षा भाऊसाहेबांना दिली गेल्याची पालिका वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
सातारा पालिकेच्या कारभारात प्रचंड अनियमितता असल्याची प्रकरणे वेळोवेळी चव्हाट्यावर आली आहेत. करंजे एमआयडीसीतील भूखंड वाटप असो की पालिका आस्थापनामधील कर्मचाऱ्यांची अनियमितता असो किंवा सफाई कर्मचाऱ्यांच्या नावाखाली बोगस बिले काढण्याचा गोरख धंदा असो सातारा पालिका प्रशासन चौकशीच्या निमित्ताने वेळोवेळी तोंडावर पडले आहे. पंतप्रधान आवास योजनेचे आर्थिक ताणे बाणे हे हाय प्रोफाईल असल्याने प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना अनियमिततेच्या दाढेला देण्याचे निर्बुद्ध उद्योग सुरू झाले आहेत.
प्रशासनाच्या मुख्य प्रशासकानेच सत्ताधाऱ्यांशी सोयीस्कर हातमिळवणी केल्याने कोणतीही स्वाक्षरी राजकीय दृष्टया थांबवण्याची कोणाची टाप नाही. भाऊसाहेबांनी नियमांची पाटीलकी काय दाखवली की लगेच सुट्टीनंतरचा त्यांचा रुजू रिपोर्ट अमान्य करण्यात आला. ज्या प्रशासनाच्या मुख्याधिकाऱ्यांनी अनियमित कारभाराचा पाकीट बंद अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचा त्याच मुख्याधिकाऱ्यांनी भाऊसाहेब पाटलांना वगळून बांधकाम विभागाचा कारभार चालवला आहे आणि वादाचे मूळ आहे पंतप्रधान आवास योजनेच्या प्रस्तावावर भाऊसाहेबांनी सही केली नाही.
या वादामुळे बांधकाम विभाग अचानक चर्चेच्या रडारवर आला आहे. राजकीय वादाचा बळी कोणी जायचे तर त्याला सध्या अभियंता भाऊसाहेब पाटील हेच उत्तर आहे. बांधकाम विभागातील या छुप्या गळचेपी वर कोणीच बोलायला तयार नाही. मात्र अंर्तगत खदखद प्रचंड आहे. राजकीय उपद्रवमूल्य करणाऱ्या समाजधुरिणांना भाऊसाहेब हे नाव अचानक प्रचंड अडचणीचा वाटू लागले आहे.
भाऊसाहेबांनी प्रकृती अस्वास्थाच कारण दिले असले तरी खरा आजार हा राजकीयच आहे. मात्र तिथे गाठ राजकीय वरिष्ठांशी असल्याने राजानं मारल तर तक्रार कोणाकडे करायची ? याच अडचणीपोटी भाऊसाहेब पाटील यांनी घरचा रस्ता पकडला आहे. 1 जूनपर्यंत पाटलांचे केबिन बंदच राहणार आहेत. त्यामुळे संवर्गातील कनिष्ठ अभियंत्यांच्या टेबलावर फाईलींची गर्दी वाढली आहे. कोठे पालिकेचे काम अडणार नाही याची काळजी स्वतः मुख्याधिकाऱ्यांनी घेतली. पाटीलकीचा वऱ्हाडी जाच असह्य झाल्यानेच भाऊसाहेबांना राजकीय शिक्षा करण्यात आली. ओव्हरटेंडरिंग या सूचक शब्दात पाटील आपत्या जवळच्या लोकांमध्ये व्यक्त झाल्याची चर्चा आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी नगराध्यक्षांच्या रजेची चर्चा होती मात्र रजेच्या शर्यतीत भाऊसाहेव सहभागी झाल्याने विलक्षण आश्चर्य व्यक्त होत आहे.