तरडोलीत 31 शेतकऱ्यांना दिल्या होत्या जमिनी; मात्र ते आलेच नाही
मोरगाव (वार्ताहर) – भाटघर, वीर धरणग्रस्तांचे तरडोली (ता. बारामती) गावात होणारे पुनर्वसन तब्बल 32 वर्षे रखडले आहे; मात्र यासाठी शासनाने केलेला लाखो रुपयांचा खर्च हा वाया गेला का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. वीर आणि भाटघर या धरण निर्मितीसाठी जमीन गेलेल्या सुमारे 31 शेतकऱ्यांना या गावात शेतजमीन देण्यात आली आहे. परंतु ज्यांना या सुविधा निर्माण केल्या ते लाभधारकच्या ठिकाणी अद्याप आलेच नाहीत. यापैकी अनेकांना आपली जमीन आहे हेच माहित नाही. येथील संपादित जमीन परत द्या, अन्यथा नवीन प्रकल्प उभारा अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.
बारामती- पुणे या प्रमुख जिल्हा मार्गालगत शेकडो एकर हे जमीन क्षेत्र अनेक वर्ष पडून आहे. खूप वर्षांपूर्वी वन विभागाच्या नावाने या जमिनीचा उल्लेख असल्याचे गावातील जाणते लोक सांगतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने गेली बत्तीस वर्षापूर्वी म्हणजे सन 1979 -80 साली जमीन पुनर्वसन कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. वीर आणि भाटघर धरणांच्या कामासाठी तेथील स्थानिकांच्या शेतजमिनी गेल्याने त्यांना पर्याय म्हणून तरडोली येथे पुनर्वसन करण्याचा शासनाचा मनसुबा होता. तसेच स्वरूपी कारवाही कागदोपत्री करण्यात आलीय.
जिल्हा पुनर्वसन विभागाच्यावतीने या ठिकाणी लाखो रुपयांचा खर्च केल्याचे वास्तव पाहायला मिळाले. शासनाने संपादन केलेली येथील शेत जमीन स्थानिक शेतकऱ्यांना द्यावी असे स्थानिकांना वाटते. पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात जागेअभावी शासनाला नवीन योजना राबवता येत नाहीत तर दुसरीकडे शेकडो एकर जमीन वापराविना पडून आहे. बारामतीच्या पश्चिम उपयुक्त ठरणाऱ्या नव्या प्रकल्पांना ही जमीन हस्तांतरित करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
आठ खोल्यांची शाळा भग्न अवस्थेत
संपूर्ण जमीन क्षेत्रात अंतर्गत रस्ते, पुलाची बांधकामे, विहिरींची निर्मिती केली आहे. आजपर्यंत या जागेचा मात्र; वापरच करण्यात आला नाही. हा संपूर्ण परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे. नियोजित पुनर्वसन कुटुंबासाठी बांधण्यात आलेली आठ खोल्यांची शाळेची इमारतही दिसते. वापराविना संपूर्ण आरसीसी वास्तू भग्न अवस्थेत पडून आहे. हे संपूर्ण पुनर्वसन क्षेत्र असल्याने स्थानिक लोक त्याकडे फिरकत नाहीत.