भोर – भाटघर धरणाच्या “सपोर्टिंग वॉल’मधून होणारी गळती थांबवण्यात आली असून, भाटघर धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र घोडपकर यांनी भाटघर धरण स्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राजेंद्र घोडपकर म्हणाले की, धरणाच्या पाण्यावर विद्युत निर्मितीसाठी 2020 आणि 2670 मी. मी. व्यासाचे लोखंडी पाइप धरणाच्या बांधकामात ठेवण्यात आलेले आहेत. या दोन्ही पाइपलाइन (पेनस्टॉक) मधून जाणाऱ्या पाण्यावरील हवेचा दाब कमी करण्यासाठी 450 मी. मी. आणि 800 मी. मी.व्यासाचा लोखंडी एअरवेन्ट पाइप उभ्या स्थितीत भिंतीच्या बाहेरील बाजूस सांडवा क्र. 670 येथे जोडण्यात आलेला आहे. 1967 मध्ये कोयनेवरील भूकंपाच्या घटनेनंतर 1971 ते 1980 च्या दरम्यान धरणाच्या भिंतीलगत (डी. एस.) बाजूस नवीन आधार भिंती धरणाचे 36 ठिकाणी स्थैर्यासाठी व मजबुतीकरणासाठी बांधण्यात आल्या आहेत. यावेळी वरील दोन्ही पाइपलाइन बांधकामात गेल्या. 1978 मध्ये धरणाच्या पाण्यावर विद्युत निर्मितीसाठी विद्युतगृह बांधण्यात आले असून, उपरोक्त एअरवेंट पाइपमधून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले असता या पाइपच्या आतील बाजूस कॅमेरे सोडून त्याचे चित्रीकरण करण्यात आले, तेव्हा या लोखंडी पाइप गंजून फुटल्याने त्यातून पाण्याची गळती होत असल्याची खात्री करण्यात आली, असून आधार भिंतीतून बाहेर पडणारे पाणी हे मूळ धारणाच्या भिंतीतून येत नसून, एअर पाइप फुटल्याने आधार भिंतीतून बाहेर पडत असल्यामुळे भाटघर धरणास कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. आधार भिंतीतून होणारी पाण्याची गळती दोन्ही विद्युत विमोचके बंद करून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. एअरवेंट पाइप बंद करून (विमोचकाच्या) पाइपमधून झाकण वेल्डिंग करून हे पाइप आधार भिंतीच्या बाहेरील बाजूने (डीएस) एअर पाइप जोडण्याचे विचाराधिन असल्याचे त्यांनी नमुद केले.
धरण प्रशासनाला चार वर्षांनंतर जाग
भाटघर धरणाच्या पाण्याची गळती होत असल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. दै. “प्रभात’ने 2016 ते 2019 या कालावधीत चार वेळा वृत्त देऊन सरकारला सावधानतेचा इशारा दिला होता. या वृत्ताची दखल घेऊन नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेने भेट देऊन पाहणीही केली होती. मात्र धरण प्रशासनाला चार वर्षानंतर का होईना जाग आली आणि भाटघर धरण सुरक्षित असल्याच्या निर्णयावार शिक्कामोर्तब झाले आहे.