भोर – भोर तालुक्यातील भाटघर धरण जलाशयात १०० टक्के पाणीसाठा झाला असून, स्वायंचलित 45 दरवाजातून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. पाऊस कमी झाला असल्याने धरण गुरुवारी (दि. 20) पहाटे १०० टक्के भरेल, असा विश्वास धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोपटकर यांनी व्यक्त केला आहे.
नीरा देवघर धरण 90 टक्के भरले आहे. भाटघर धरण परिसरात आतापर्यंत 745 मिमी तर नीरा देवघर धरण परिसरात 1457 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला असून जलाशय पातळी पूर्ण क्षमतेने वाढली असल्याने जलाशयाला साडी-चोळी, हार-नारळ अर्पण करून कार्यकारी अभियंता राजेंद्र धोपटकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी भाटघर धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता अनिल नलावडे, नीरा देवघर धरण प्रकल्पाचे डेप्युटी अभियंता अशोक चव्हाण, नानासाहेब कांबळे, भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंग शेटे, सूर्यकांत किंद्रे, नितीन धारणे आणि धरण प्रकल्पाचे कर्मचारी उपस्थित होते.
भाटघर धरण हे 24 टीएमसी पाणी साठवण क्षमतेचे असून, या धरणाचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात संकलित केले जाते आणि ते डाव्या उजव्या कालव्यांद्वारे पूर्वेकडील बारामती, इंदापूर, फलटण, खंडाळा आणि सोलापूरकडील शेतीसाठी पुरवले जाते.
धरणाला एकूण 81 दरवाजे (मोऱ्या) असून, यात 45 दरवाजे स्वयंचलित आहेत. येळवंडी नदीवार हा प्रकल्प ब्रिटिश राजवटीत कालावधीत उभारला असून धरणाचे संपूर्ण बांधकाम चिरेबंदी दगडा व घाणीच्या चुन्यात केलेले आहे.