बेल्लारी -कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारची बदनामी करून आणि जनतेचे ध्रुवीकरण करून भाजपने केंद्राची सत्ता मिळवली, असे टीकास्त्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी सोडले.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने 1 हजार किलोमीटर अंतराचा महत्वाचा पल्ला पार केला. त्यानिमित्त कर्नाटकमध्ये कॉंग्रेसने विशेष सभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये सहभागी झालेल्या गेहलोत यांनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला.
केंद्राची सत्ता मिळवल्यानंतर भाजपने लोकपालची अंमलबजावणी केली नाही. त्याशिवाय, परदेशांतून काळा पैसाही आणला नाही. त्या पक्षामुळे देशाची लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला. पदयात्रा काढणाऱ्या राहुल यांची गेहलोत यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. देशासमोर आज उभ्या असलेल्या आव्हानांवर यात्रेने फोकस केला आहे. त्यामुळे राहुल देशात इतिहास घडवणार आहेत, असे त्यांनी म्हटले.
Bharat Jodo | राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा एक हजार किमीचा टप्पा पुर्ण
गेहलोत यांचे समर्थक असणाऱ्या राजस्थानमधील आमदारांनी अलिकडेच बंडाचे निशाण फडकावत एकप्रकारे स्वपक्षाचीच (कॉंग्रेस) कोंडी केली. त्यामुळे गेहलोत यांनी पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढावून घेतल्याचे मानले जाते. अशात त्यांनी कर्नाटकमधील सभेला लावलेली उपस्थिती आणि राहुल यांची केलेली स्तुती यांचे महत्व वाढले आहे.