करोना रुग्णांच्या काळजी संदर्भातील कामाची जिल्हाधिकारी राम यांच्याकडून दखल
आंबेगाव बुद्रुक – जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरा मेडिकल स्टाफ यांच्या समर्पित भावनेने व सेवेने करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.
भारती हॉस्पिटलमध्ये पुणे येथे गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाबाधित महिलेवर उपचार चालू होते. तिची तब्येत अतिशय गंभीर होती. डॉ. अस्मिता कदम-जगताप आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने व कर्मचाऱ्यांनी काळजी घेतल्याने महिलेच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून व्हेंटिलेटरवरून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
करोनाचे रुग्ण योग्य उपचाराने बरे होत आहेत, ही आनंददायी आणि उत्साहवर्धक बाब आहे. वैद्यकीय अधिकारी तसेच इतर परिचारिकांनी करोनाबाधित रुग्णांना दिलेल्या या अमूल्य सेवेबद्दल समाज कायम ऋणी राहील. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही भारती हॉस्पिटलचे कर्मचारी आणि सेवक वर्गाचे कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेबद्दल अभिनंदन केले आहे.
भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता कदम-जगताप स्वतः हॉस्पिटल मध्ये उपस्थित राहून आपल्या स्टाफसह करोनाबाधित रुग्णांची देखभाल अहोरात्र करीत आहेत. हॉस्पिटल मध्येच स्वत: जेवण बनवून आपल्या स्टाफला देत आधार दिला. पुणे जिल्हाधिकारी राम यांनी स्वतः जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना फोन करुन भारती हॉस्पिटलने योग्य उपचार केल्यामुळे करोनाचा रुग्ण बरा होत आहे, ही या परिस्थितीत भारती हॉस्पिटलची चांगली कामगिरी असल्याचे म्हंटले आहे.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही याबाबत समाधान्य व्यक्त केले आहे.