रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचे 85 वे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेसची ही परिषद राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. याच अधिवेशात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतील अनुभव यावेळी व्यक्त केले आहेत.
या अधिवेशनात भारत जोडो यात्रेविषयी बोलताना राहुल गांधी यांनी,”चार महिने कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा आम्ही काढली. व्हिडिओत तुम्ही माझा चेहरा पाहिला. मात्र आमच्यासोबत लाखो लोकं चालत होते. प्रत्येक राज्यात लोक आमच्यासोबत चालले. उन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता लोक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रा मला खूप काही शिकवून गेली. भारत जोडो यात्रेमुळे माझा अहंकार नष्ट झाला असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
या अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेबाबत आपला अनुभव शेअर केला आहे. यावेळी त्यांनी,” मी व्हिडिओ पाहात होतो तेव्हा मला अनेक आठवणी आल्या. तुम्ही सगळ्यांनीही पाहिलं असेल पंजाबमध्ये एक मॅकेनिक येऊन मला भेटला. मी त्याचे हात हातात घेतले त्यानंतर अनेक वर्षांचे त्याचे प्रयत्न, त्याच्या वेदना या मी ओळखल्या. अशाच प्रकारे लाखो शेतकऱ्यांना मी भेटलो. त्यांच्याशी हात मिळवलं, त्यांना भेटलो की मला त्यांच्या व्यथा कळत असत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
LIVE: Day 3 of the Congress’ 85th Plenary session in Nava Raipur, Chhattisgarh. #CongressSankalp2024 https://t.co/R1ZvB4YVZZ
— Congress (@INCIndia) February 26, 2023
केरळच्या बोट रेसमध्ये मी बोटीत बसलो होतो तेव्हा पूर्ण टीमसह मी पुढे चाललो होतो. माझ्या पायात खूप वेदना होत होत्या. माझे फोटो काढले जात होते पण मी हसत होतो पण रडावंसं वाटत होतं इतक्या वेदना होत्या. मी यात्रा सुरू केली तेव्हा मला एक अहंकार होता की मी तर आरामत ही यात्रा पूर्ण करेन. माझ्या मनात ही बाब तेव्हा होती. मात्र त्याचवेळी जुन्या एका जखमेने डोकं वर काढलं. मी महाविद्यालयात असताना फुटबॉल खेळत असाताना माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर ही दुखापत बरी झाली. मात्र मी जेव्हा भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा या वेदना परत होऊ लागल्या.
तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात तुम्हाला मोकळेपणाने सांगतोय. मी रोज सकाळी हाच विचार करायचो रोज कसं चालू? मला रोज प्रश्न पडायचा. मी कंटेनरमधून उतरायचो आणि चालायला सुरूवात करायचो. लोकांना भेटायचो, पहिल्या दहा पंधरा दिवसात माझा अहंकार संपला असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. माझा अहंकार का संपला कारण, भारतमातेने मला हा संदेश दिला की तू निघाला आहेस, तुला कन्याकुमारी ते काश्मीर चालायचं आहे तर आधी अहंकार संपव. मला ही भारतमातेनेच दिलेली साद होती. मी ते ऐकलं, त्यामुळेच माझी भारत जोडो यात्रा यशस्वी झाली असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
आधी मी शेतकऱ्यांना भेटायचो तेव्हा मी त्याला काही उपदेश करण्याचा प्रयत्न करायचो. माझ्या परिने त्याला सांगू लागायचो. मात्र हळूहळू हे सगळं बंद झालं. एक शांतता मला लाभली. त्या शांततेत मी लोकांचं म्हणणं गांभीर्याने ऐकू लागलो. हे सगळे बदल हळूहळू झाले. त्यानंतर जेव्हा मी काश्मीरला पोहचलो तेव्हा मी खूपच शांत झालो होतो असेही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे.