मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून त्यात १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेवर सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. आता विरोधपक्षाने या घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी नवजात शिशू केअर युनिटमधील बालकांचे मृत्यू म्हणजे हत्या असल्याचे म्हटले आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील नवजात शिशु केअर युनिटमध्ये मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
या घटनेबाबत दु:ख व्यक्त करताना राम कदम यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये 10 निष्पाप बालकांचा मृत्यू हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाला असून ही हत्या आहे. त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.
महाराष्ट्र #भंडारा जिल्हय़ातील #हॉस्पिटल मध्ये 10 निष्पाप बालकांचा प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे दुर्दैवी मृत्यू.. ही हत्या आहे.. त्याला जबाबदार #महाराष्ट्रसरकार आहे #MVA @CMOMaharashtra @rajeshtope11
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) January 9, 2021
या व्यतिरिक्त विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. बालकांचा दुर्दैवी मृत्यू ही अत्यंत वेदनादायी घटना असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.